प्रत्येक नागरिकाला प्रगतीचे पंख देण्याची क्षमता संविधानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार

संविधानाच्या ७५ वर्षानिमित्त गौरवशाली परंपरेच्या चर्चेत मुख्यमंत्र्यांचा सहभाग

लोकशाही ही संविधानाचा सर्वात मोठी ठेव

मुंबई, दि. २६ : हे जगात सर्वोत्तम आहे. भारताचे २०४७ मध्ये विकसित देशाचे स्वप्न साकारवयाचे आहे. ही स्वप्नपूर्ती करण्याची क्षमता संविधानात असून देश संविधानाने दिलेल्या मार्गावर चालत आहे. संविधानाने सामाजिक, आर्थिक, राजकीय क्रांती आणली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बनविलेल्या संविधानामुळे रक्त विरहीत क्रांती देशात झाली. या संविधानात प्रत्येक भारतीयाला प्रगतीचे पंख देण्याची क्षमता आहे, असे गोरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत काढले. भारतीय संविधानाच्या ७५ वर्ष गौरवशाली परंपरेच्या चर्चेमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी सहभाग घेत मनोगत व्यक्त केले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शासनाच्यावतीने ४३४ औद्योगिक प्रशिक्षण केंद्रामध्ये संविधान मंदीर स्थापन करण्यात आले आहेत. मूल्यशिक्षणात संविधानाची मुल्ये शिकविण्यात येणार आहेत. प्रत्येक तालुक्यात संविधान भवन बांधण्यात येणार आहे. उच्च भारतीय मुल्यांचा विचार करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान तयार केले आहे. भारत जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झाली आहे, लवकरच जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार आहे. लंकेतील सीतेची सुटका, गीतेचा उपदेश आणि बुद्धाचे तत्त्वज्ञान संविधानात आहे. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे, तोपर्यंत भारताचे संविधान कुणीही बदलू शकणार नाही. त्यामुळे संविधानाला कोणताही धोका नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

इंग्रजांचे कॅबिनेट मिशन

देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी इंग्रजांनी त्या काळात भारतात कॅबिनेट मिशन पाठविले. या कॅबिनेट मिशनमध्ये तीन मंत्री होते. या कॅबिनेट मिशनने भारताला स्वतंत्र करण्यासाठी भारताचे स्वत:चे संविधान असायला पाहिले, असा अहवाल दिला आहे. भारतीय नेतृत्वाशी चर्चा करून संविधान सभा निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. भारत सरकार 1935 चा कायदा करण्यात आला. संविधान सभेने एकेका कलमावर, शब्दावर चर्चा केली आहे. सभेने 165 दिवस 11 तास काम केले. या सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी झाली तर शेवटची बैठक 24 जानेवारी 1950 रोजी झाली. तसेच 26 नोव्हेबर 1949 रोजी संविधान स्वीकारले, तर 26 जानेवारी 1950 रोजी संविधान अंमलात आणले.

संविधान सभेचे कामकाज

जगात सर्वाधिक प्रदीर्घ काळ संविधान निर्मितीचे काम भारतीय संविधान सभेने केले आहे. सभेमध्ये 389 सदस्य होते, त्यापैकी 292 सदस्य प्रोव्हेंशनस असेम्बंली मधून निवडून आले होते. 92 सदस्य हे संस्थानचे होते, 4 जण चिफ कमीशनर कॉन्सीट्युएन्सीमधून निवडून आले होते. संविधान सभेचे पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी झाली, या अधिवेशनाची सुरूवातही वंदे मातरमने झाली होती. संविधान सभेने मसुदा लेखन समिती तयार केली. या समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. या मसुदा समितीने अंतिम मसुदा 4 नोव्हेंबर 1948 रोजी सादर केला. संविधान लागू करताना संविधानात उद्देशिका, 22 भाग, 395 कलमे होती. आता संविधानात 25 भाग, 448 कलमे, 12 परिशिष्ठ आहेत. मसुदावेळी 7 हजार 635 सुधारणा सुचविण्यात आल्या होत्या, त्यापैकी 2 हजार 473 सुधारणा स्वीकारण्यात आल्या. संविधानात आतापर्यंत 106 घटना दुरूस्त्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये 106 वी दुरूस्ती महिलांना संसदेत व विधानसभेत 33 टक्के आरक्षणाची आहे.

लोकशाही ही संविधानातील सर्वात मोठी ठेव

संविधनातील उद्देशिका आपली आहे. आम्ही भारतीय लोक सांगतो, म्हणून हे जोपासण्याची जबाबदारी आपली आहे. पाश्चिमात्य देशातील हे संविधान नाही. ठिकठिकाणी बंधुता हे शब्द दिसतात. हे गौतम बुद्धांचे तत्वज्ञान आहे. संधीची समानता त्यांनी दिली. जात, धर्म यांच्या आधारे संधी दिली जाणार नाही. सर्वांना समान संधी दिली जाईल. लंकेतील सीतेची सुटकादेखील संविधानाच्या मूळ प्रतीमध्ये दाखवलेली आहे. ती यासाठी दाखवलेली आहे, की आम्हाला या संविधानाचा नारी सन्मानासाठी वापर करायचा आहे, हे त्यातून अभिप्रेत करण्यात आलेले आहे. गीतेचा उपदेश देखील याच संविधानात दाखवला आहे. या तत्त्वावर उभे राहिलेले हे संविधान आहे. या संविधानात सर्वात मोठी ठेव ही लोकशाही आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

भारतीय जीवन पद्धत ही संविधानाचा आत्मा

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महात्मा गांधी नेहमी म्हणायचे रामराज्य आणायचे आहे. राजा जेव्हा भेदभाव करत नाही, त्याला रामराज्य म्हणतात. समाजातील छोट्या छोट्या लोकांना एकत्रित करून त्यांना शक्ती राजा देतो. त्याला रामराज्य म्हणतात. हे पूर्णतः भारतीय मूल्यांवर तयार केलेले संविधान आहे. अशोक चक्र हे कायद्याचे व धर्माचे चक्र आहे. धर्म हे सातत्याने पुढे जाणारे गतीमान चक्र आहे. काळाच्या बरोबर चालण्याचे धैर्य दाखवले नाही, तर आपण पुढे जाऊ शकत नाही. भारतीय जीवन पद्धत ही संविधानाचा आत्मा आहे. संविधानाने मुलभूत हक्क बहाल केले आहेत. कायद्यासमोर समानता आहे. धर्म, भेद यावरून भेदभाव करता येणार नाही. सामाजिक समानता, समान संधी, कलम १५ मध्ये भेदभाव करता येणार नाही, असे बाबासाहेबांनी सांगितले आहे. पण एखादा समाज जर मागे राहिला असेल तर शैक्षणिक आरक्षण तरतूदही केली आहे.

संधीची समानता

संविधानाने सर्वांना संधीची समानता दिली आहे. प्रत्येक व्यक्तीची प्रतिष्ठा समान आहे. कुठल्याही व्यक्तीला जात, पंथ, धर्म या आधारावर संधी मिळणार नाही. प्रत्येकाची प्रतिष्ठा राहीली पाहिजे, असा प्रयत्न डॉ. बाबासाहेबांनी संविधानात केला आहे. संविधानातून राजकीय लोकशाही नको, सामाजिक, आर्थिक लोकशाही आली पाहिजे, असे डॉ. बाबासाहेब सांगायचे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. भारतीय संविधानाने पहिल्या दिवसापासून मतदानाचा अधिकार दिला आहे. भारत एक संघराज्य प्रणाली आहे. हे राज्य सांस्कृतिक एकतेवर अवलंबून आहे. कार्यपालिका, न्यायपालिका, विधीपालिका हे तीन स्तंभ भारतीय लोकशाहीचे आहे. तर अदृश्य स्तंभ हा प्रसार माध्यमे आहे. संविधानात राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे दिली आहे. या तत्वानुसार समान नागरी कायदा करण्याची जबाबदारी प्रत्येक राज्यावर दिली आहे. नागरिकांना भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र एकरूप समान नागरी संहिता लागावी, यासाठी राज्य प्रयत्नशील राहील, असेही या तत्वानुसार नमूद केले आहे. पशु, जनावरे यांच्या कत्तलीस मनाई करण्याचे तत्वही राज्य धोरण मार्गदर्शक तत्वामध्ये आहे.

मुख्यमंत्री यांचे भाषण पुस्तक स्वरूपात येणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संविधानाची ७५ वर्ष गौरवशाली परंपरेच्या चर्चेत सहभाग घेत मनोगतानंतर सदस्य भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संविधानावरील विधानसभेतील भाषण पुस्तक रूपात प्रकाशित करीत पुस्तक सर्वांना उपलब्ध करून देण्याची मागणी केली. ही मागणी विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर यांनी मान्य करीत मुख्यमंत्री यांचे भाषण पुस्तक रूपातच नव्हे, तर डिजिटल स्वरूपातही वितरित करण्यात येणार असल्याचे सांगितले.

0000

नीलेश तायडे/विसंअ/