मुंबई, दि. २४ : महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाने २७ जून २०२४ रोजीच्या परिपत्रकानुसार राज्यातील सर्व दिव्यांग उमेदवारांना केंद्र शासनाच्या स्वावलंबन पोर्टलवरून वितरित होणारे दिव्यांग प्रमाणपत्र आणि वैश्विक ओळखपत्र (युडीआयडी कार्ड) अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व भरती प्रक्रियेत १ मे २०२५ पासून करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीत दिव्यांग उमेदवारांसाठी त्यांच्या खात्यात युडीआयडी कार्ड क्रमांक नोंदविण्याची व त्यास स्वावलंबन पोर्टलवरून वैधता (Validation) मिळविण्याची सुविधा आधीच उपलब्ध करून देण्यात आली आहे.
उमेदवारांकडे जर स्वावलंबन पोर्टलचे दिव्यांग प्रमाणपत्र आणि युडीआयडी कार्ड दोन्ही असतील, तर ते तपशील खात्यात नोंदवणे अनिवार्य आहे. ज्या उमेदवारांकडे सद्यस्थितीत स्वावलंबन पोर्टलवरुन वितरित केलेले दिव्यांग प्रमाणपत्र नाही. तथापि राज्य शासनाच्या एसएडीएम पोर्टलवरुन वितरित करण्यात आलेले दिव्यांग प्रमाणपत्र आहे. अशा उमेदवारांनी एसएडीएम प्रमाणपत्रासह वैश्विक ओळखपत्रासाठी नोंदणी केल्याचा क्रमांक (Enrolment Number) अनिवार्य असेल तथापि उमेदवारांना मुलाखतीपूर्वी वैश्विक ओळखपत्र सादर करणे आवश्यक असेल.
उमेदवाराचे नाव, दिव्यांगत्वाचा प्रकार, स्थिती इत्यादी तपशील पडताळल्यानंतरच माहिती वैध ठरवली जाईल. खात्यातील आणि युडीआयडी कार्डवरील जन्मदिनांक एकसारखे असणे आवश्यक आहे.
कोणत्याही जाहिरातीसाठी अर्ज करताना दिव्यांग तपशील वैध असल्याशिवाय अर्ज स्वीकारला जाणार नाही. त्यामुळे सर्व दिव्यांग उमेदवारांनी ही प्रक्रिया शक्य तितक्या लवकर पूर्ण करावी, असे आवाहन आयोगाने केले आहे.
००००००००
राजू धोत्रे/विसंअ