मुंबई, दि. २ : महाराष्ट्रातील प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्या कौशल्य विकासासाठी राज्य शासनाने ५ ते ९ मे २०२५ दरम्यान “टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीकचे” आयोजन केले आहे. या कार्यक्रमांतर्गत सर्व प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांनीं आयोजित केलेल्या प्रशिक्षणासाठी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून केले आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात “टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक” या विषयावर अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही सोमवार दि.५, मंगळवार दि.६ आणि बुधवार दि. ७ मे २०२५ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. तर ‘जय महाराष्ट्र’कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार दि. ६ मे २०२५ रोजी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर रात्री ८.०० वा. प्रसारित होणार आहे. तसेच महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवर खाली दिलेल्या लिंकवरून ही मुलाखत पाहता येणार आहे. निवेदिका सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.
एक्स- https://twitter.com/MahaDGIPR,
फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR,
यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR,
महाराष्ट्रातील प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्या कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण संस्कृती निर्माण करण्यासाठी राज्य शासनातर्फे “टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक” हा कार्यक्रम आयोजित केला आहे. आधुनिक तंत्रज्ञान व नवीन कल्पनांचा संगम असलेली टेक वारी म्हणजे पहिली डिजिटल वारी असून याची सुरूवात मंत्रालयातून होणार असून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांच्या कानाकोपऱ्यात तंत्रज्ञानाचा प्रसार करुन त्यामधून आधुनिक तंत्रस्नेही महाराष्ट्र घडविण्याची प्रयत्न करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांना प्रशासकीय कामामध्ये कुशलता वाढवून कामांची गुणवत्ता वाढवणे, समाजाप्रती आपले उत्तरदायित्व जोपासणे, कमी कालावधीत अधिक अचूक काम करणे व लोकाभिमुख असणे आदी बाबींवर भर देण्यात येणार आहे. यासाठी केंद्र शासनाच्या Integrated Government online Training (iGOT) प्रणालीवर प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याअनुषंगाने ‘दिलखुलास’ व ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून या कार्यक्रमाचे स्वरूप आणि पार्श्वभूमी, याविषयी अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी माहिती दिली आहे.
०००