७ हजार ८३० क्विंटल अन्नधान्याचे वाटप – अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची माहिती
मुंबई, दि. ३ : राज्यातील ५२ हजार ४३६ स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु असून १ ते २ जुलै कालावधीत राज्यातील १ लाख ९८ हजार ३२६ शिधापत्रिका धारकांना ७ हजार ८३० क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले आहे, त्याशिवाय, १ लाख ९७ हजार २२३ शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे ७ कोटी आहे. या लाभार्थ्यांना ५२ हजार ४३६ स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो.
राज्यात या योजनेमधून सुमारे ४ हजार ३६३ क्विंटल गहू, ३ हजार ४७१ क्विंटल तांदूळ, तर ४७ क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्थलांतरित झालेले परंतु लॉकडाऊनमुळे राज्या अडकलेल्या सुमारे ६ हजार ३४९ शिधापत्रिकाधारकांनी ते जेथे राहत आहे त्याठिकाणी शासनाच्या पोर्टेबिलिटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत प्रति लाभार्थी प्रतिमहिने ५ किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. दि. ६ जून पासून आतापर्यंत जून महिन्यासाठी एकूण १ कोटी २४ लाख २७ हजार ७५८ रेशनकार्ड धारकांना मोफत तांदूळ वाटप केले आहे. या रेशनकार्डवरील ५ कोटी ६२ लाख १७ हजार ९१२ लोकसंख्येला २८ लाख १० हजार ९०० क्विंटल तांदळाचे वाटप झाले आहे.
राज्य शासनाने कोविड-१९ संकटावरील उपाययोजनेसाठी ३ कोटी ८ लाख ४४ हजार ०७६ एपीएल केसरी लाभार्थ्यांना प्रतिव्यक्ती ५ किलो धान्य सवलतीच्या दराने (गहू ८ रुपये प्रति किलो व तांदूळ १२ रुपये प्रति किलो) देण्याचा निर्णय घेतला आहे. या धान्याचे जूनसाठी आतापर्यंत ४ लाख ७७ हजार ३४० क्विंटल वाटप केले आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेत प्रति रेशनकार्ड १ किलो मोफत डाळ (तूर किंवा चणा डाळ) देण्याची तरतूद आहे. आतापर्यंत या योजनेतून सुमारे ३ लाख २६ हजार २७५ क्विंटल डाळीचे एप्रिल ते जून महिन्यासाठी वाटप केले आहे.
आत्मनिर्भर भारत या योजनेचा अन्नधान्य लाभ मे व जून या महिन्यांसाठी असून त्या अंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट नसलेल्या शिधापत्रिका नसलेल्यांना प्रतिव्यक्ती ५ किलो मोफत तांदुळ दिला जात आहे आतापर्यंत ८० हजार ५२० क्विंटल मोफत तांदुळ वितरित केला आहे.
राज्यात १ ते २ जुलै कालावधीत ८५४ शिवभोजन केंद्रातून पाच रूपये प्रतिथाळी याप्रमाणे १ लाख ९७ हजार २२३ शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले आहे. तसेच एप्रिल ते जुलै या कालावधीत ९० लाख ७७ हजार २३२ शिवभोजन थाळ्या वाटप झाल्या आहेत.
राज्यातील स्वस्त धान्य दुकानांतून सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या अन्नधान्याचे वाटप सुव्यवस्थितरित्या होत असल्याबाबत संनियंत्रण करण्यात येत असून, काळाबाजार करणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदारांवर कारवाई करण्यात येत आहे.
0000