छत्रपती संभाजीनगर, दि.१३(जिमाका)- शहराचा वाढता विस्तार व संलग्न औद्योगिक वसाहतीत येऊ घातलेले नवे उद्योग पाहता शहराच्या रहदारीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी शेंद्रा बिडकीन बायपास रस्त्याचा तयार केलेल्या प्रस्तावात रस्ता जोडणीच्या नव्या सुचनांसह सुहारीत प्रस्ताव सादर करावा,असे निर्देश राज्याचे इमाव कल्याण, अपांपारिक उर्जा मंत्री अतुल सावे यांनी आज संबंधित यंत्रणांना दिले.
शेंद्रा बिडकीन बायपास या रस्त्याच्या कामासंदर्भात आज श्री.सावे यांनी संबंधित यंत्रणांची बैठक बोलावली होती. बैठकीस जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाचे व्यवस्थापक संघर्ष मेश्राम, अधीक्षक अभियंता अनिकेत कुलकर्णी, कार्यकारी अभियंता सुर्यकांत गलांडे, ऑरिक सिटीचे उप महाव्यवस्थापक शैलेश धाबरकर, प्रकल्प व्यवस्थापक अरुण दुबे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक येरेकर, हिरासिंग ठाकूर आदी उपस्थित होते.
सद्यस्थितीत प्रस्तावित शेंद्रा बिडकीय बायपास रस्ता हा ३५ किमी लांबीचा असून हा प्रस्ताव २०१७ पासून तयार करण्यात आला आहे. येत्या कालावधीत हा प्रकल्प पूर्ण होईस्तोवर शहराचा विस्तार आणखीन वाढेल तसेच अधिक उद्योग या दरम्यान आलेले असतील. तसेच या प्रकल्पात आता धुळे सोलापूर महामार्ग, समृद्धी महामार्ग, वाळूज औद्योगिक वसाहत तसेच अहिल्यानगर, पुणे कडे जाणारा रस्ता या सर्व रस्त्यांना प्रस्तावित मार्गाची जोडणी असणे आवश्यक आहे. याबाबीचा अंतर्भाव या प्रकल्पात करावा. तसेच आगामी कालावधीत पुर्वेकडून जालना येथील ड्रायपोर्ट व पश्चिमेकडून वाढवण बंदर हे दोन प्रकल्प पूर्ण होताच या मार्गावरील रहदारीचे , मालवाहतुकीचे प्रमाण वाढणार आहे. या सर्व मुद्यांचा विचार करुन सुधारीत प्रस्ताव त्वरीत सादर करावा,असे निर्देश श्री.सावे यांनी दिले.
०००००