जनतेच्या सहकार्याने अमली पदार्थ मुक्त कामठी करणार – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

पालकमंत्र्यांच्या नेतृत्वात ‘अमलीपदार्थ विरोधी रॅली’ 

नागपूर, दि.२१ :  गेल्या वर्षभरात कामठी तालुक्यात अमलीपदार्थ विरोधी ३० मोठ्या कारवाया करून ६० लोकांना अटक करण्यात आली आहे. जनतेने आपल्या परिसरात सुरू असलेल्या अमली पदार्थांच्या व्यवहाराबद्दल निडरपणे पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करत जनतेच्या  सहकार्याने कामठी शहर अमलीपदार्थ मुक्त  करू,असे प्रतिपादन महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे केले.

नागपूर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने ऑपरेशन थंडर-२०२५ अंतर्गत कामठी येथील जयस्तंभ चौकात अमलीपदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी श्री. बावनकुळे बोलत होते. पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल, माजी राज्यमंत्री ॲड.सुलेखा कुंभारे, नागपूर पोलीस परिमंडळ -५चे पोलीस उपायुक्त निकेतन कदम आदी यावेळी उपस्थित होते.

श्री. बावनकुळे म्हणाले,तरुण पिढीला अमली पदार्थाचे व्यसन लावून त्यांचे आयुष्य उध्वस्त करण्याचे एक छुपे युद्ध सुरू आहे. अमली पदार्थाच्या आहारी गेलेले तरुण हे व्यसन करण्यासाठी गुन्हेगारीकडे वळतात. कामठी शहरातही तरुणाईला अमली पदार्थाच्या विळख्यात ओढणारे षडयंत्र सुरू आहे. हे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी नागपूर पोलीस आयुक्तालयाने थंडर मोहीम सुरू केली आहे. जनतेने निडरपणे पोलीसांना अमलीपदार्थ विक्रेत्यांची माहिती द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

येत्या काळात नागपूर शहर पोलीस परिमंडळ-४ अंतर्गत खापरा, जरीपटका हद्दीतील भागांचा समावेश असलेले नवीन पोलीस स्टेशन निर्माण करण्यात  येईल, येथील भाजीमंडी परिसरात पोलीस स्थानक उभारण्यात येईल तसेच कामठी  शहर १०० टक्के सीसीटीव्ही सर्व्हेलन्सने सज्ज करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

पोलीस आयुक्त डॉ. सिंगल यांनी ‘ऑपरेश थंडर’ अंतर्गत गेल्या दीड वर्षात करण्यात आलेल्या विविध कारवायांद्वारे ८ कोटी ६५ लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती यावेळी  दिली. पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांनी प्रास्ताविक केले तर पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांनी आभार मानले.

श्री. बावनकुळे यांच्या नेतृत्वात यावेळी जयस्तंभ चौक ते गोयल टॉकीज पर्यंत ‘अंमली पदार्थ विरोधी रॅली’ काढण्यात आली. सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी व विविध शाळा व महाविद्यालयांचे विद्यार्थी या रॅलीत सहभागी झाले. तत्पूर्वी, श्री. बावनकुळे यांनी जयस्तंभ चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

००००