पंढरपूर/सोलापूर, दिनांक 22 (जिमाका):- पंढरपूर शहर महास्वच्छता अभियान 2025 अंतर्गत एकाच वेळी सकाळी सात ते दहा या कालावधीत 42 ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून 148 टन कचरा गोळा करण्यात आला. या मोहिमेत सोलापूर जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संस्थांचे स्वयंसेवक, विविध सामाजिक संघटना, पंढरपूर शहरातील नागरिक यांनी सक्रिय सहभाग घेऊन ही विठुरायाची नगरी बहुतांश स्वच्छ केली आहे. या मोहिमेतून पंढरपूर शहर व येथे येणाऱ्या हजारो भाविकांच्या घरोघरी स्वच्छतेचा संदेश पोहोचविण्याचे क्रांतिकारी कार्य घडले असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.
पंढरपूर शहर महास्वच्छता अभियान 2025 चा समारोप कार्यक्रम प्रसंगी पालकमंत्री जयकुमार गोरे मार्गदर्शन करत होते. यावेळी आमदार समाधान आवताडे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, सोलापूर महापालिकेचे आयुक्त सचिन ओम्बासे, माजी आमदार प्रशांत परिचारक, पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके,नगरपालिका प्रशासन अधिकारी वीणा पवार, पंढरपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख व मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री श्री गोरे पुढे म्हणाले की, या स्वच्छता अभियानातून श्री विठुरायाची नगरी स्वच्छ करण्याचे काम आपल्या सर्वांच्या श्रमातून झालेले आहे. ही वारी पूर्वीची स्वच्छता असून वारीनंतरही स्वच्छता करण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी सोलापूर जिल्ह्यासह सातारा जिल्ह्यातील ही सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला असून आजच्या मोहिमेत सात ते आठ हजार स्वयंसेवक नागरिकांनी सहभाग घेतला. यामध्ये तरुणांचा सहभाग ही महत्त्वपूर्ण बाब होती व पुढील काळात या स्वच्छतेच्या संदेशाबाबत नागरिकांमध्ये प्रबोधन करतील व स्वतःही क्रियाशीलपणे राबवतील असे त्यांनी सांगितले.
पंढरपूर शहरातील सर्व नागरिक व्यापारी, व्यावसायिक यांनी आपापल्या दुकानासमोर कचरा टाकण्यासाठी छोट्या छोट्या कचरा पेट्या ठेवाव्यात व त्यामध्येच कचरा टाकून तो नगरपालिकेच्या कचरा संकलन टीम कडे द्यावा. त्याप्रमाणेच विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूर नगरीत येणाऱ्या वारकरी भावी यांनीही कचरा कोठेही रस्त्यावर टाकू नये नगरपरिषदेने उपलब्ध करून दिलेल्या जवळपासच्या कचराकुंड्यामध्येच कचरा टाकावा असे आवाहन पालकमंत्री गोरे यांनी करून स्वच्छ पंढरपूर, स्वच्छ चंद्रभागा, नमामी चंद्रभागा यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे त्यांनी सांगितले.
पंढरपूर हे संपूर्ण राज्यासाठी महत्त्वाचे व पवित्र धार्मिक ठिकाण असून या विठुरायाच्या नगरीचा सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. पंढरपूरच्या कॉरिडॉरच्या विषयी सर्वांच्या संमतीनेच पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री गोरे यांनी दिली. तसेच सर्व मानाच्या पालख्या सह अन्य पालख्या, दिंड्या यांचे प्रस्थान पंढरपूरसाठी झालेले आहे. आषाढी यात्रा सोहळ्यासाठी पंढरपूर येथे आल्यानंतर या सर्वांना सर्वोच्च व्यवस्था प्रदान केली जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच या मोहिमेत सहभाग घेतल्याबद्दल जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, सामाजिक संस्था, नागरिक व स्वयंसेवक यांचे त्यांनी कौतुक केले.
आमदार सचिन आवताडे यांनी पालकमंत्री महोदयांनी त्यांच्या संकल्पनेतून वारी पूर्वी पंढरपूर शहर स्वच्छ करण्यासाठी राबवलेल्या महा स्वच्छता अभियानाचे कौतुक केले व वारी संपल्यानंतर ही अशी मोहीम राबवण्याची मागणी केली.
प्रारंभी उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांनी प्रास्ताविकात स्वच्छता अभियानाचे महत्त्व सांगून प्रशासनाच्या वतीने येथे येणाऱ्या भाविकांना चांगल्या सुविधा देण्याबरोबरच शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सर्वोत्तपरी प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगितले. तर मोहिमेत सर्वांनी सहभाग घेतल्याबद्दल मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी आभार मानले.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते सफाई मित्रांचा सन्मान
आजच्या महास्वच्छता अभियानात सहभाग घेऊन स्वच्छता मोहीम राबविलेल्या काही सफाई मित्रांचा प्रतिनिधी स्वरूपात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये लक्ष्मण गोविंद सोनवणे, रविकिरण दोडिया, श्रीमती शांता विठ्ठल वाघमारे, अजय शंकर तावरे, ओंकार जनार्दन वाघमारे यांच्यासह कोळगाव ग्रामपंचायत तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. तसेच लायन्स क्लब पंढरपूर, वृक्षप्रेमी ग्रुप पंढरपूर, एव्हर ग्रीन क्लब, क्रीडाई संस्था व लोकमान्य विद्यालय पंढरपूर यांचाही सत्कार करण्यात आला.
महास्वच्छता अभियानाचा शुभारंभ
पंढरपूर शहर महास्वच्छता अभियान 2025 चा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पालकमंत्री, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व अन्य मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात स्वच्छता केली.