मुंबई, दि. ३० : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘आषाढी वारीनिमित्त जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आलेले नियोजन व सोयी-सुविधा‘ या विषयासंदर्भात सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे.
‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत बुधवार दि. 2 आणि गुरूवार दि. 3 जुलै 2025 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर आणि ‘News On AIR’ मोबाईल अॅपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक कृपा कुलकर्णी यांनी ही मुलाखत घेतली आहे.
आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवनाची अत्यंत महत्त्वाची परंपरा आहे. भाविकांच्या सुरक्षिततेला आणि सोयी-सुविधांना प्राधान्य देत राज्य शासनाने संपूर्ण नियोजन केले आहे. वारीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवा, पाणीपुरवठा, वाहतूक व्यवस्थापन, आपत्कालीन यंत्रणा, स्वच्छता आणि सुरक्षा यावर विशेष भर देण्यात आला आहे. यासाठी विविध शासकीय विभागांमध्ये समन्वय साधण्यात आला असून, स्थानिक प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. यंदा वारकऱ्यांसाठी ‘मुख्यमंत्री निवारा सुविधा’ही नवी संकल्पना राबवण्यात आली आहे. त्याअनुषंगाने ‘दिलखुलास‘ कार्यक्रमात वारी मार्गावरील वैद्यकीय पथके, ॲम्ब्युलन्स सेवा, आपत्कालीन प्रतिसाद पथके, स्वच्छतागृहे, जल व्यवस्था तसेच वाहतूक नियंत्रणासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी श्री. आशीर्वाद यांनी दिली आहे.
०००
जयश्री कोल्हे/ससं/