विधानसभा कामकाज

प्रत्येक जिल्ह्यात कृत्रिम वाळूचे ५० क्रशर्स देणार – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, दि. १७ : राज्यामध्ये नैसर्गिक वाळूवरचे अवलंबित्व कमी करण्यासाठी कृत्रिम वाळूचे धोरण शासनाने आणले आहे. याबाबत कार्यपद्धती जाहीर करण्यात आली आहे. या धोरणांतर्गत प्रत्येक जिल्ह्यात ५० कृत्रिम वाळूचे क्रशर्स देखील देण्यात येणार आहेत, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे सांगितले.

महसूल मंत्री श्री बावनकुळे म्हणाले, लोकप्रतिनिधींनी हे कृत्रिम वाळू धोरण समजून घेऊन आपल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घ्यावी. या धोरणाला प्रोत्साहन द्यावे.

0000

नीलेश तायडे/विसंअ/

प्रवासी वाहनांच्या तक्रारीसाठी मुंबई महानगर प्रदेशासाठी १८००२२०११० टोल फ्री क्रमांक – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई, दि. १७ : शहरातील ऑटोरिक्षा,टॅक्सी,ओला-उबर,प्रवासी वाहने तत्सम प्रवासी वाहनांसंदर्भात भाडे नाकारणे, प्रवाशांशी उध्दटपणे वागणे, मर्यादेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करणे, बॅज प्रदर्शित न करता वाहन चालविणे, अतिरिक्त भाडे आकारणे अशा प्रकारच्या प्रवाशांच्या तक्रारींचे निरसन करता यावे. बेशिस्त चालकांविरुध्द कारवाई करता यावी, याकरिता संपूर्ण मुंबई क्षेत्र विकास प्राधिकरणासाठी प्रवासी टोल फ्री क्रमांक १८००-२२०-११० सुरु करण्यात आला आहे, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी निवेदनाद्वारे विधानसभेत सांगितले.

परिवहन मंत्री श्री सरनाईक म्हणाले, याबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पश्चिम), अंधेरी येथे नियंत्रण कक्ष २४ तास सुरु आहे. परिवहन विभागामार्फत प्रथमच अशाप्रकारे नागरिकांसाठी सेवा सुरु करण्यात येत आहे. या कक्षाला प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने संबंधित कार्यालयास ई-मेलद्वारे अवगत करण्यात येते. दोषी आढळलेल्या वाहन मालकांना नोटीस पाठविण्यात येऊन कारवाई करण्यात येते. त्यांची सुनावणी घेऊन दोषी वाहनांची नोंद ब्लॅकलिस्टमध्ये घेण्यात येते. ब्लॅकलिस्टमध्ये नमूद वाहनांवर दंडात्मक कारवाई होईपर्यंत वाहनांसंबंधीचे पुढील कोणतेही कामकाज करण्यात येत नाही.

ही कारवाई यापुढे देखील प्रभावीपणे चालू राहणार आहे. मुंबई महानगर प्रदेशातील नागरिकांनी ऑटोरिक्षा, टॅक्सी, ओला-उबर,प्रवासी बसेस सारख्या प्रवासी वाहनांसंदर्भात काही मदत हवी असल्यास या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी. मुंबई महानगरातील वाहतूकीबाबत सुलभ सेवा निर्माण करण्याकरिता नागरिकांनी या टोल फ्री सेवेचा लाभ घेऊन परिवहन विभागास सहकार्य करावे, असे आवाहनही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.

0000

नीलेश तायडे/विसंअ/