मुंबई, दि. 6 : कामगार-कर्मचारी चळवळीत न्याय हक्कांसाठी लढतानाही सामाजिक भान राखणे महत्त्वाचे असते असा संवेदनशीलतेचा धडा घालून देणारा नेता हरपला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे माजी सरचिटणीस ज्येष्ठ नेते र.ग. कर्णिक यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली वाहिली आहे.
मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, महाराष्ट्राला चळवळींचा इतिहास आहे. यात कामगार-कर्मचारी चळवळीचा इतिहास लिहिताना ज्येष्ठ नेते र. ग. कर्णिक यांच्या कर्मचारी संघटनेच्या उभारणीची दखल निश्चितच घेतली जाईल. संघटनेची वाटचालही महाराष्ट्राच्या लौकिकाला साजेशी राहील असे त्यांनी काम केले. यामुळेच त्यांना देशभरातील कर्मचारी संघटना मार्गदर्शक मानत. अनेक दशके लाखो कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करताना त्यांनी संघर्षाची धार आणि व्यापक समाजहित यांचा समतोल साधला. संघटना पक्षातीत ठेवणे आणि गरज पडल्यास समाजाच्या हाकेला धावून जाण्याची त्यांची शिकवण यापुढेही मार्गदर्शक ठरेल. ज्येष्ठ नेते र. ग. कर्णिक यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
000