मुंबई, दि. १ : चंद्रपूर येथील रामाळा तलावाच्या स्वच्छतेबाबत पर्यावरणमंत्री श्री.आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेण्यात आली. तलावात मिसळणाऱ्या घरगुती सांडपाण्यावर प्रक्रिया करणे व तलाव स्वच्छ करणे याबाबत लघु, मध्यम व दीर्घ स्वरुपाचा कृती आराखडा तयार करुन ७ दिवसांत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांना दिले. तसेच तलाव स्वच्छ करणे या बाबीला प्राथमिकता देऊन हे काम लवकरात लवकर होईल याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हाधिकारी कार्यालय यांनी समन्वयाने नियोजन करावे, असे निर्देशही श्री.ठाकरे यांनी दिले.
ऑनलाईन झालेल्या या बैठकीस महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव श्री.अशोक शिनगारे, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी श्री.अजय गुल्हाने, चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले, ईकोप्रो संस्थेचे अध्यक्ष श्री.बंडु धोत्रे उपस्थित होते.
रामाळा तलाव चंद्रपूर शहराच्या मध्यभागी असून सुमारे ६०० वर्षे जुना आहे. तलावात आजुबाजूच्या वस्तीतून निर्माण होणारे घरगुती सांडपाणी तसेच लगतच्या रेल्वे डेपोमधून येणारे सांडपाणी मिसळत असल्याने मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाले असून संपूर्ण तलाव जलपर्णीने भरला आहे. तलावातील पाणी स्वच्छ करण्याचा तसेच तलावातील गाळ काढण्याचा मागील १०-१२ वर्षापासून प्रयत्न होत असून तलाव पूर्णत: स्वच्छ करणे व गाळ काढण्याचे काम अद्यापपावेतो पूर्ण झालेले नाही. तलाव स्वच्छ करणे व आजुबाजूचा परिसर सुशोभित करण्याकरिता अंदाजे ४०.५० कोटी रुपये इतका निधी आवश्यक आहे, अशी माहिती यावेळी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी श्री.अजय गुल्हाने यांनी दिली.
रामाळा तलाव स्वच्छतेसंदर्भात काम हाती घेतल्याने उपोषणास न बसण्याबाबतच्या पर्यावरणमंत्री श्री.ठाकरे यांच्या विनंतीनुसार इकोप्रो संस्थेचे अध्यक्ष श्री.बंडू धोत्रे यांनी उपोषणास न बसण्याबाबत मान्य केले.
००००