सांगली, दि. 09, (जि. मा. का.) : जुलैमध्ये आलेल्या अतिवृष्टी व महापुराने विविध घटकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामध्ये शेतकऱ्यांचेही नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे. त्यामुळे शेतीचे पंचनामे व्यवस्थित करा, पंचनामे करताना शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचणी निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या. प्रत्येक पूरबाधिताला त्याच्या हक्काचे धान्य मिळेल याकडे कटाक्षाने लक्ष द्या असे निर्देश मदत व पुनर्वसन राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी दिले.
सांगली जिल्ह्यातील पूरपश्चात विविध विषयांचा आढावा कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत घेतला. यामध्ये त्यांनी कोरोना सध्यस्थिती, लसीकरण, पंचनामे, अन्न नागरी पुरवठा, कृषी, सार्वजनिक बांधकाम आदी विषयांचा सविस्तर आढवा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, सांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अप्पर पोलीस अधिक्षक मनिषा डुबुले, प्र.अप्पर जिल्हाधिकारी मौसमी बर्डे-चौगुले, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पृथ्वीराज पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी मिलिंद पोरे, जिल्हा लसीकरण अधिकारी विवेक पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष रोकडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्ह्यात महापुरामुळे 97 हजार 486 शेतकऱ्यांचे 40 हजार 671 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असुन सुमारे 70 टक्के क्षेत्राचा पंचनाम पुर्ण झाला आहे. उर्वरित 30 टक्के क्षेत्राचा पंचनामा लवकरात लवकर करावा असे सांगून कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम म्हणाले, पंचनामे करताना शेतकऱ्यांना, सामान्य नागरिकांना कोणतीही अडचणी येवू नये यासाठी विशेष दक्षता घ्यावी. असे निर्देश यावेळी त्यांनी दिले. जिल्ह्यात बाधीत झालेल्या कृषी क्षेत्रापैकी 74 हजार 782 शेतकऱ्याकडील 27 हजार 590 हेक्टर क्षेत्राचा पंचनामा झाल्याचे यावेळी सांगण्यात आले. सन 2019 च्या महापुराच्या तुलनेत यावर्षीच्या महापुरामुळे व अतिवृष्टीमुळे मोठ्याप्रमाणावर गाळ साचला असून जमिन खरवडून जाणे व गाळ साचणे यामुळे नजर अंदाजे 8 हजार 8 शेतकऱ्यांकडील 925 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. यामधील 6 हजार 24 शेतकऱ्यांकडील 415 हेक्टरचे म्हणजे जवळपास 93 टक्के क्षेत्राचे पंचनामे झाले आहेत.
अतिवृष्टी व पुरस्थितीमुळे 4 तालुक्यातील 113 गावे बाधित झाली असून 32 हजार 791 कुटंबांचे पंचनामे झाली आहेत. पंचनामे झाल्यानूसार पुर्णत: नष्ट झालेली कच्ची घरे 429 व पक्की घरे 134 तर अंशत: नष्ट झालेली कच्ची घरे 1691 व पक्की घरे 724 आहेत. 38 झोपड्या व 933 गोठ्यांचेही नुकसान झाले आहे. आज अखेर 101 लहान मोठी जनावरे व 49 हजार 508 कुकुटपक्षांचे पंचनामे झाले आहेत. अशी माहिती यावेळी देण्यात आली.
39 हजार 761 पूरबाधित कुटुंबे असून 26 हजार 894 कुटुंबांचे पंचनामे पुर्ण झाले आहेत. यातील 18 हजार 980 कुटुंबाना 10 किलो तांदुळ, 10 किलो गहू व 5 किलो तूरडाळ वितरित करण्यात आले आहे. यावेळी अन्न व नागरिक पुरवठा राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी पंचनामे पुर्ण झालेल्या बाधित कुटुंबांना आपल्या हक्काचे अन्न धान्य मिळाले पाहिजे याबाबत दक्षता घेण्याबाबत निर्देश संबधित विभागाला दिले.
यावेळी कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढवा घेतला. सध्या जिल्ह्यात 6 हजार 697 कोरोना बाधित रुग्ण आहेत. पुरग्रस्त गावांमध्ये कोरोना चाचणी वाढवा, सप्टेंबर ऑक्टोंबर महिन्यात तीसरी लाट येण्याचा अंदाज तज्ञांनी वर्तवले असून त्या दृष्टीने ऑक्सिजन अनुषंगिक औषधांची तजविज ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले. यावेळी जिल्ह्यात आत्तापर्यंत झालेल्या लसीकरणाचा आढवा घेवून लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेल्या कितीजणांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे त्याचा डाटाबेस तयार करण्याचा आदेशही त्यांनी यावेळी दिले.