स्वातंत्र्य सैनिकांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार होणार

मुंबई, दि. १६. राज्यातील सर्व स्वातंत्र्य सैनिक/त्यांच्या जोडीदारांचा प्रत्येक जिल्ह्यातील पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार शासन परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटना, महाराष्ट्र यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हास्तरावर शासनामार्फत भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे. प्रत्येक स्वातंत्र्य सैनिक व विधवा पत्नी यांचा योग्य तो सन्मान पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात यावा अशी मागणी केली होती. स्वातंत्र्य सैनिक व त्यांचे पाल्य यांचे विविध मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार राज्यातील सर्व स्वातंत्र्य सैनिक / त्यांचे जोडीदार यांचा सत्कार करण्याबाबत हे शासन परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील स्वातंत्र्य सैनिकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेल्या योगदानाप्रित्यर्थ कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी राज्यातील सर्व स्वातंत्र्य सैनिक/त्यांचे जोडीदार यांचा मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार प्रत्येक जिल्ह्यातील पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पालकमंत्री यांनी दिलेल्या वेळेनुसार सर्व (केंद्र व राज्य) स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्याच्या सूचना सर्व जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.

0000

पवन राठोड/स.सं