जिल्हाधिकारी ठरले अपघातग्रस्त तरूणासाठी देवदूत !

0
6

जळगाव, दि. २१ (जिमाका) :  नशिराबाद पुलावर गुरूवारी रात्री दहाच्या  सुमारास अपघात होऊन अत्यवस्थ अवस्थेतील तरूणांसाठी तेथून जाणारे जिल्हाधिकारी अमन मित्तल देवदूत ठरले. जिल्हाधिकाऱ्यांनी दाखविलेल्या संवेदनशीलतेमुळे त्यांचे समाजाच्या सर्व स्तरातून

कौतुक होत आहे.

रावेरहून पूर परिस्थितीचा पाहणी दौरा आटोपून येत असतांना जिल्हाधिकारी मित्तल यांना नशिराबाद पुलावर दुचाकीच्या बाजूला अत्यवस्थ अवस्थेत पडलेला तरुण रूपेश कमलाकर सोनवणे (वय -३२ रा. प्रिंपाळे, जळगाव) दिसला. जिल्हाधिकाऱ्यांनी घटनास्थळी त्यांचे वाहन थांबवत, त्यांच्या मागून येणाऱ्या वाहतूक पोलीस शाखेच्या इंटर सेप्टर व्हॅनमध्ये पाठवत डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व धर्मादाय रूग्णालयात दाखल केले‌. रूपेश च्य नातेवाईकांशी संपर्क होईपर्यंत तसेच प्रकृतीची माहिती येईपर्यंत जिल्हाधिकारी रूग्णालयात मध्यरात्रीपर्यंत स्वतः थांबून होते.

अपघातात रूपेश सोनवणेला मेंदूला जबर इजा झाली‌ होती. अपघात झाल्यानंतर पंधरा ते वीस मिनिटाच्या कालावधीतच त्याला दवाखान्यात दाखल केल्यामुळे तरूणाचा जीव वाचला आहे‌. जिल्हाधिकाऱ्यांनी रूग्णालय वाहिकेची प्रतिक्षा न करता त्यांच्या मागून येणाऱ्या वाहतूक शाखेच्या वाहनात तरूणाला भरती करण्याचा तात्काळ निर्णय घेतला. रूग्णालयात येईपर्यंत दहा मिनिटांच्या कालावधीत जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः रूग्णालय वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क करून ठेवला‌. त्यामुळे तरूणाच्या उपचारांसाठी वैद्यकीय चमू सज्ज होता‌. जिल्हाधिकाऱ्यांनी तत्परतेने केलेल्या मदतीमुळे तरूणांचे प्राण वाचले आहेत. सध्या या तरूणांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉ. रितेश पाटील यांनी दिली आहे .

तरूणाचा जीव वाचवण्यासाठी जिल्हाधिकारी श्री. मित्तल यांना वाहतूक शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील, पोलीस नाईक विजय पाटील, गणेश वाटे, मिलिंद पाटील, दिपक पाटील, सचिन मोहिते, नागरिक पवन भोई व डॉ. रितेश पाटील यांची मदत झाली‌.

०००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here