‘मेरी माटी मेरा देश’ अभियान ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान देशभरात राबविणार

0
7

नवी दिल्ली दि. 27 : ‘आझादी का अमृत महोत्सव’ ‘मेरी माटी मेरा देश’ चा समारोप या अभियानाने करण्यात येणार असून ग्रामीण भागात वसुधा वंदन, शिलाफलकम (स्मारक) यासह अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

‘मेरी माटी मेरा देश’ कार्यक्रमांतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी ग्रामीण विकास मंत्रालयाचे सचिव शैलेश कुमार सिंह आणि युवा कार्य विभागाच्या सचिव मीता राजीवलोचन यांच्या संयुक्त अध्यक्षतेखाली अलिकडेच बैठक झाली. या बैठकीत सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.

युवा कार्य सचिव यांनी कार्यक्रमाच्या स्वरूपाबाबत सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे आयोजन 09 ते 15 ऑगस्ट 2023 या कालावधीत करण्यात येणार असून देशभरातील सुमारे 7,500 ब्लॉकमधून निवडलेले तरुण दिल्लीच्या कर्तव्यपथावर या कार्यक्रमासाठी एकत्र येतील. ते त्यांच्या राज्यातील सर्व गावे/ग्रामपंचायतींमधून माती आणतील. ‘वसुधा वंदन’ कार्यक्रमाची दिल्लीतील कर्तव्य मार्गावर उभारण्यात येणाऱ्या अमृत वाटिकेत देशी वनस्पती आणि शिलाफलकम असणार आहेत.

ग्रामविकास सचिव शैलेश कुमार सिंह यांनी ‘वसुधा वंदन’ आणि ‘शिलाफलकम’चे महत्त्व सांगत, प्रत्येक ग्रामपंचायत/गाव वसुधा वंदन अंतर्गत देशी प्रजातींची 75 रोपे लावून पृथ्वीमातेचे संवर्धन करतील. तसेच ‘वसुधा वंदन’ कार्यक्रम अमृत सरोवर किंवा कोणत्याही जलकुंभावर किंवा शाळा, ग्रामपंचायत इमारती किंवा ग्रामपंचायतीने ठरविल्यानुसार योग्य ठिकाणी / सार्वजनिक ठिकाणी आयोजित केला जाऊ शकेल.

देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सर्व वीरांप्रति आपल्या मनातील भावना व्यक्त करणे हा या कार्यक्रमाचा मूळ उद्देश आहे. ग्रामीण विकास सचिवांनी सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना लोकसहभाग सुनिश्चित करण्याचे आवाहन केले असून सर्व स्तरातील लोकांना कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही केले आहे.

0000

अमरज्योत कौर अरोरा /

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here