अमृत महोत्सवी वर्षात सात सूत्रांच्या माध्यमातून जिल्हा विकासाचा संकल्प – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

0
8

चंद्रपूर, दि. १६:  जिल्ह्याच्या विकासामध्ये कृषी व संलग्न सेवा, खनिकर्म, उद्योग, पर्यटन, पायाभूत सुविधा, सामान्यसेवा व प्रदूषण नियंत्रण असे सात सूत्र हाती घेऊन कार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अमृत महोत्सवी वर्षात सात सूत्रांच्या संदर्भात विविध माध्यमातून आरोग्य, शिक्षण, सिंचन, कृषी, ग्रामविकास, रोजगार, वन व पर्यटन अशा अनेक क्षेत्रात जिल्हा विकासाच्या बाबतीत पुढे नेण्याचा संकल्प केला असल्याची ग्वाही राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी दिली.

भारतीय स्वातंत्र्याच्या ७६ वा वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पार पडला, यावेळी ते बोलत होते. याप्रंसगी पालकमंत्री यांच्या समवेत आमदार किशोर जोरगेवार, आमदार सुधाकर अडबाले, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, सहाय्यक जिल्हाधिकारी मुरुगानंथम एम.,मनपा आयुक्त विपिन पालीवाल, अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर आदीसह विविध विभागाचे विभाग प्रमुख, स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंब आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. ९ ऑगस्टला चले जाव, क्विट इंडिया व भारत छोडो हा जयघोष झाला. १९४२ च्या स्वातंत्र्यसंग्रामात देशात पहिला मान हा चंद्रपूर जिल्ह्याचा आहे. १६ ऑगस्ट १९४२ ला चिमुरची क्रांती झाली आणि यूनियन जॅक खाली आला. बर्लिनच्या आकाशवाणीवरून घोषणा झाली की, चिमूर हा देशाचा पहिला भूभाग आहे, जो इंग्रजांच्या ताब्यातून मुक्त झाला. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी हजारो-लाखो शहिदांनी स्वत:च्या प्राणांची आहुती दिली. आणि १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपल्या हाती या देशाच्या स्वातंत्र्याचा मंगल कलश आला.

शिवराय व वीरांचा इतिहास भारतीय तिरंग्याला आहे. स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. अमृत महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमाची सुरुवात ९ ऑगस्टपासून करण्यात आली आहे. विश्वगौरव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा समारोप पूर्ण देशभर करण्याचा निर्णय केला आणि या कार्यक्रमाच्या निमित्याने “मेरी माटी मेरा देश” मिट्टी को नमन-विरो को वंदन हे अभियान ९ ऑगस्टपासून सुरू झाले. २३ ऑगस्ट रोजी डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम उद्यान येथे वसुधा वंदन व वीरो का वंदन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून माती हातात घेऊन पंचप्रणचा संकल्प करावयाचा असल्याचे ते म्हणाले. त्‍याच दिवशी संध्‍याकाळी चंद्रपूर येथील क्‍लब ग्राऊंडवर सांस्‍कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले आहे.

पालकमंत्री श्री. मुनगंटीवार पुढे म्हणाले की, जगातील सर्वाधिक वाघ चंद्रपूर जिल्ह्यात आहे. चंद्रपूर हा वन, गुण व खनिज संपन्न जिल्हा आहे. राज्यात जनतेच्या हितासाठी काम करणारे सरकार असून चंद्रपूर जिल्हा हा इतर जिल्ह्यापेक्षा विकासामध्ये अग्रेसर राहिला हा अभिमान आहे. देशातील सर्वात उत्तम सैनिक शाळा, वन अकादमी, बसस्थानके, इ-लायब्ररी, बॉटनिकल गार्डन, वन प्रशिक्षण व संशोधन केंद्र, नियोजन भवन, कोषागार भवन, वसतिगृहे, अभ्यासिका, प्राथमिक आरोग्य केंद्रे, क्रीडा संकुले व कॅन्सर हॉस्पिटल अशा अनेक बांधकामासह २०५ कामे मागील पाच वर्षात पूर्ण केली. हा स्वातंत्र्यानंतरचा जिल्ह्याच्या गतीचा सर्वोच्च वेग होता. जिल्ह्याच्या विकासासाठी नवीन ११४ प्रकल्प हाती घेण्यात आले आहे. एस.एन.डी.टी विद्यापीठाचे ५० एकरमधील केंद्र, शिक्षणाची आराधना करणारे ८.३६ हेक्टरवरील गोंडवाना विद्यापीठाचे उपकेंद्र, अत्याधुनिक कृषी महाविद्यालय तसेच चंद्रपूर हा कामगारांचा जिल्हा असून केंद्र सरकारच्या ई.एस.आय.सीच्या माध्यमातून १०० बेडेड कामगार हॉस्पिटल बांधण्याचे कार्य हाती घेण्यात आले आहे. त्यासोबतच, मूल येथे ५० बेडेड रुग्णालय आता १०० बेड हॉस्पिटल होणार आहे. जिल्ह्यातील तरुणांसाठी मोरवा एअरपोर्ट येथे फ्लाईंग क्लब सुरू करण्यात येत आहे. नुकतेच बॅडमिंटन कोर्टला राज्य सरकारने मान्यता दिली असून येणाऱ्या माहे, सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धा आयोजित करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा लाभला असून येथे माणिकगढ किल्ला, भटाळी, सिद्धेश्वर मंदिरासारखे क्षेत्र असून या क्षेत्राच्या विकासासाठी साधारणतः ४० कोटी रुपयांचा निधी ऐतिहासिक वारसाचे जतन व विकासासाठी तसेच १०० वर्षापेक्षा जुनी जुबली हायस्कूलच्या नुतनीकरणासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.  त्यासोबतच, १०० इलेक्ट्रिक बसेस जिल्ह्याच्या सेवेसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा प्रत्येक क्षेत्रात पुढे जावा ही भावना मनात ठेवून तसेच जिल्ह्याचा गौरव वाढावा यासाठी अनेक महत्त्वपूर्ण कामे झालीत. अयोध्या येथे प्रभूरामाच्या मंदिरासाठी काष्ठ टिकवूड चंद्रपूर जिल्ह्यातील असून प्रभूरामाच्या गर्भगृहातील लाकूड चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्याच्या दंडकारण्यातील आहे. तर सेंट्रल विस्टा येथील मुख्य दरवाजा हा चंद्रपूर जिल्ह्यातील लाकडाचा आहे. ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे ते म्हणाले.

भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेबांनी देशाला संविधान समर्पित केले. भयमुक्त, भूकमुक्त व विषमतामुक्त भारत हा संविधानाचा संकल्प आहे. भारत सरकारने नुकतेच टायगर प्रोजेक्टचे मूल्यांकन केले. देशातील सहा उत्तम टायगर प्रोजेक्टची निवड करण्यात आली. त्या सहापैकी तीन टायगर प्रोजेक्ट हे महाराष्ट्राचे आहे तर ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे नाव पहिल्या पाचमध्ये आहे. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी जी पालखी निघेल ती चंद्रपूर जिल्ह्यातील लोकाकडून दिलेली असेल. ही पालखी जिल्ह्यातील लोकांची राहील याचा मला सार्थ अभिमान आहे. राजगुरूंनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती दिली. राजगुरूंचे २५५ कोटीचे स्मारक करण्याच्या कामाला नुकतीच सुरुवात झाली आहे. त्यासोबतच, मध्यप्रदेश येथील नगरपरिषद प्रशासनाशी बैठक घेऊन चंद्रशेखर आझाद यांच्या स्मारकाचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. सिंदखेडराजा येथे सुद्धा १५० कोटीचा आराखडा तयार करण्यात आला असून माता जिजाऊच्या सिंदखेडराजा हा ऊर्जा व प्रेरणा देणारे केंद्र बनेल असा विश्वास पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केला.

पालकमंत्र्यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी सत्कार :

वीर नारी अरुणा सुनील रामटेके, वीर नारी पार्वती वसंतराव डाहुले व वीर पिता वसंतराव डाहुले, वीर नारी छाया बाळकृष्णा नवले व वीर पिता बाळकृष्ण नवले शौर्य चक्र प्राप्त झाल्याबद्दल नायब सुभेदार शंकर गणपती मेंगरे जिल्हा सा.रु. चंद्रपूरअंतर्गत नर्सिंग क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवरील फ्लोरेन्स नाईटेंगल पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल पुष्पा श्रावण पोडे यांना सन्मानित करण्यात आले. निवडणूक विभागातंर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चिखली येथील सहा. शिक्षक कविराज मानकर,  महात्मा ज्योतिबा जन आरोग्य योजना राज्य आरोग्य हमी सोसायटीतंर्गत रुग्णांना मोफत लाभ पुरवल्याबद्दल डॉ. हर्षित नागरकर व डॉ.सीमा भंडारी, शिक्षणाधिकारी (प्राथ.) अंतर्गत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात ११ वी मेरिट प्राविण्य प्राप्त केल्याबद्दल कु. सान्वी संजय दिकोंडवार हिचा गौरव करण्यात आला. वनसंरक्षक व संवर्धन, वनविकास, मानव व वन्यजीव संघर्ष व कार्यालयीन कामकाजात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल वनरक्षक सुनीता मट्टामी, रागिनी रमेश बडगे व  वनपाल राहुल ठमके, तसेच पाणीपुरवठा व स्वच्छता (जि.प.) कार्यालयातंर्गत गाव हागणदारीमुक्त, प्रत्येक घरी शोषखड्डे करून सांडपाणी व्यवस्थापन व घनकचरा व्यवस्थापन, शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून गाव मॉडेल करण्याबाबत ग्रा.प. कुकूडसाथ ता. कोरपणा येथील सरपंच शंकर बाबुराव आत्राम यांचा सत्कार पालकमंत्री श्री.  मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आला.

०००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here