२०४७ च्या आत्मनिर्भर भारतासाठी चंद्रपूरचे योगदान राहील : पालकमंत्री श्री. मुनगंटीवार

0
5

चंद्रपूर, दि.२५ : ‘मेरी माटी, मेरा देश’ या उपक्रमांतर्गत राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून चंद्रपुरात ‘साद सह्याद्रीची…भूमी महाराष्ट्राची’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. चंद्रपुरकरांनी उत्साहपूर्ण वातावरणात देशभक्तीचा जागर करत डोळ्याचे पारणे फिटल्याची भावना व्यक्त केली.

२३ ऑगस्ट रोजी सायंकाळी 6.05 वाजता भारताच्या वैज्ञानिकांनी चांद्रयान – 3 हे मिशन यशस्वी करून दाखविले. या गोष्टीचा जोश नागरिकांमध्ये होताच. त्यानंतर लगेच सुरू झालेल्या ‘साद सह्याद्रीची…भूमी महाराष्ट्राची’ या रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमात डौलाने फडकणारा तिरंगा आणि नागरिकांचा उत्साह अभुतपूर्व होता. सांस्कृतिक विभाग (म.रा.), जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद व चंद्रपूर महानगर पालिकेच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन चांदा क्लब ग्राऊंडवर करण्यात आले होते.

प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि पूजा सावंत तसेच प्रसिद्ध गायक नंदेश उमप यांच्यासह जवळपास ३०० कलाकारांनी आपल्या सादरीकरणातून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. यात शिवराज्याभिषेक सोहळा, भारतीय स्वातंत्र्याचा लढा, संयुक्त महाराष्ट्राचा लढा, वारक-यांच्या वेशातील सादरीकरण, देवीचा जागर, अस्सल मराठी नृत्य, पोवाडा, सीमेवरील जवानांच्या वेशातील सादरीकरण अशा विविध नृत्यांनी आसमंत दणाणला. चांद्रयान मोहिमेचे यश, वैज्ञानिकांचे परिश्रमाचे फळ आणि देशभक्तीचा जागर असा त्रिवेणी संगम बुधवारी चंद्रपुरात अनुभवायला मिळाला.

२०४७ च्या आत्मनिर्भर भारतासाठी चंद्रपूरचे योगदान राहील – पालकमंत्री 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून 9 ऑगस्ट 2023 पासून ‘मेरी माटी मेरा देश’ (माझी माती माझा देश) या उपक्रमाला सुरुवात झाली. जिल्हा प्रशासनाच्या वतीने गावपातळीपर्यंत हा उपक्रम अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. सन 2047 रोजी भारतीय स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण होणार आहे. 2047 च्या आत्मनिर्भर भारतासाठी चंद्रपुरचे नक्कीच योगदान राहील, अशी अपेक्षा पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

चांदा क्लब ग्राऊंड येथे ‘साद सह्याद्रीची…भूमी महाराष्ट्राची’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षात भारताला भयमुक्त, भूकमुक्त, विषमतामुक्त, समतायुक्त घडवायचे आहे. त्यासाठी प्रत्येकाचे योगदान आवश्यक आहे. सद्यस्थितीत आपण भद्रावती येथून सीमेवरील आपल्या सैन्यासाठी बॉम्ब पाठवितो. चंद्रपुरात 122 एकर मध्ये असलेल्या सैनिक स्कूलमधून भविष्यात देशाच्या रक्षणासाठी हे सैनिक जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आपले चंद्रपूर नेहमी अग्रेसर असले पाहिजे, चंद्रपुरचा गौरव वाढावा, यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे आवाहनही पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी केले.

०००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here