अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी शासनस्तरावर विशेष निधीकरिता प्रयत्न करणार : मंत्री छगन भुजबळ

0
4

नाशिक, दिनांक 30 (जिमाका वृत्तसेवा) : वादळ, गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतपीकांचे अतोनात नुकसान झाले असून अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनस्तरावर विशेष निधीकरिता प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले. आज येवला व निफाड तालुक्यातील वादळ, गारपीट व अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतपीकांच्या नुकसानीची पाहणी मंत्री छगन भुजबळ यांनी केली त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी समवेत उपविभागीय अधिकारी येवला बाबासाहेब गाढवे, उपविभागीय अधिकारी निफाड हेमांगी पाटील, येवला तहसिलदार आबा महाजन, निफाड  तहसिलदार शरद घोरपडे, येवला तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड, निफाड तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

मंत्री छगन भुजबळ यावेळी म्हणाले, अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे हे जलदगतीने करण्यात यावेत यात एकही बाधित शेतकरी सुटता कामा नये. बाधित शेतकऱ्यांच्या पाल्यांच्या शालेय शिक्षण फी माफीबाबतही योग्य निर्णय घेण्यात येणार आहे. शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी क्रॉप कव्हर योजना आणण्यात येईल. तसेच बाधित क्षेत्राचा विचार करता पीक विम्याबाबत सुद्धा शासन स्तरावरून प्रयत्न करणार असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी  शेतकऱ्यांना अश्वासित केले. ‘खचून जाऊ नका’अशा शब्दात मंत्री छगन भुजबळ यांनी बाधित शेतकऱ्यांना धीर दिला.

आज मंत्री छगन भुजबळ यांनी येवला तालुक्यातील कातरणी, सोमठाण देश व निफाड तालुक्यातील वेळापूर, पिंपळगाव नजिक, वनसगांव या गावांत वादळ, गारपीट व अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतपीकांच्या नुकसानीची पाहणी केली.

000000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here