‘महालक्ष्मी सरस’मधील बचत गटांच्या उत्पादनांची विक्री महिलांचा उत्साह वाढवणारी : ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन

0
4

मुंबई, दि.7: महालक्ष्मी सरस महिला बचत गटांच्या प्रदर्शनाच्या माध्यमातून वीस कोटीच्या उत्पादनांची विक्री झाली आहे. बचत गटांच्या उत्पादनांची विक्री ही राज्यातील महिला बचत गटातील सदस्यांचा उत्साह वाढवणारी ठरली आहे, असे मत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले.

महालक्ष्मी सरस कार्यक्रमाचा उदघाटन प्रसंगी मंत्री श्री. महाजन यांनी ‘महालक्ष्मी सरस’ च्या माध्यमातून गेल्या वर्षी बचतगटांच्या माध्यमातून 17 कोटी रुपयांच्यावर उत्पादनांची विक्री झाली आहे. यंदा या विक्रीमध्ये वाढ होऊन 25 कोटी रुपयांच्यावर वस्तूंची विक्री होईल असे म्हणाले होते.

उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नत्ती अभियानांतर्गत वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे भरविले जाणारे महालक्ष्मी सरस प्रदर्शन व विक्री 2023-24 दि. 26 डिसेंबर ते 7 जानेवारी यादरम्यान आयोजित केले होते. बचत गटांमधील महिलांच्या सर्वांगीण विकासावर भर आणि त्यांना उद्योजक म्हणून नवीन ओळख निर्माण करण्याची संधी ह्या प्रदर्शनामार्फत  उमेद अभियानाच्या माध्यमातून  करण्यास प्रयत्नशील असते. 65 लाखांहून अधिक महिला या अभियानाशी जोडल्या गेल्या आहेत. ह्यात ग्रामीण भागातील महाराष्ट्रातील आणि इतर राज्यातील एकूण 513 स्टॉल्स आहेत व 75 फूड स्टॉल्स होते.

राज्यातील सहा लाख बचतगटांना सन 2022 -23 मध्ये सहा हजार कोटी रुपयांचे कर्ज मिळाले होते. तर यामध्ये वाढ होऊन 23-24 मध्ये हा कर्ज वितरण पुरवठा 7 हजार कोटी पर्यंत बचतगटांना कर्ज मिळाले आहे. महिला बचत गटांनी घेतलेले कर्ज फेडण्याचे प्रमाण हे 98 टक्के आहे.

प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच 26 डिसेंबर पासून मुंबईकरांचा प्रचंड असा प्रतिसाद प्रदर्शन व विक्रीस पाहण्यास मिळाला, फूड कोर्टमध्ये असलेल्या अस्सल महाराष्ट्रीय खाद्यसंस्कृतीचा आणि प्रदर्शन व विक्री स्थळी असणाऱ्या दर्जेदार कुशल हातातून साकारलेल्या हस्तकला  उत्पादनांना मुंबईकरांची वाढती पसंती व खरेदी पाहावयास मिळाले. महालक्ष्मी सरस प्रदर्शन व विक्री यांची एकूण उत्पादनांची विक्री 5 जानेवारी 2023 पर्यंत एकंदरीत 20.81 कोटी रुपये इतकी झाली व लोकांचा एकंदरीत प्रतिसाद पाहता पुढील दोन दिवसात ह्यामध्ये 7 ते 10 कोटी रुपयांची वाढ पाहण्यास मिळू शकते व एकूण विक्री 30 कोटींपर्यंत जाऊ शकते असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

ह्या दरम्यान भारतातूनच नव्हे तर विदेशी नागरिकांनीही भेटी दिल्या. महालक्ष्मी सरसला येणाऱ्या मुंबईकरांनी ग्रामीण भागातील येणाऱ्या महिलांचा कर्तृत्वाचा आणि कौशल्याचे भरभरून कौतुक करत त्यांना प्रोत्साहन देताना पाहायला मिळाले. महालक्ष्मी सरस ह्याची वाट मुंबईकर उत्सवाप्रमाने पाहतात व आवर्जून भेट देतात. ग्रामीण भागातील तळागळातील येणाऱ्या महिला व त्यांचा कलाकुसर पाहण्यास लोकांची अक्षरशः गर्दी पाहण्यास मिळाली. ग्रामीण भागातील आलेल्या महिलांना भेटण्याची संधी व त्यांनी केलेल्या संघर्षातून निर्माण केलेल्या कलाकारीतून व्यवसायाचा अभ्यास करण्यास अनेकांनी प्रयत्न केले.

शाळेतील काही विद्यार्थ्यांची शैक्षणिक भेटही पाहायला मिळाली. तसेच मुंबईतील काही नामांकित एमबीएच्या विध्यार्थ्यानी ग्रामीण भागातील संघर्षातून उभा केलेल्या महिलांचा व्यवसायांचा अभ्यास व प्रोजेक्ट यासाठी संशोधनार्थ महिलांचा व्यव्यसायाविषयी अभ्यास करताना पाहायला मिळाले. महालक्ष्मी सरसचा माध्यमातून मुंबईकरांना एकाच ठिकाणी अनेक गोष्टी पाहण्यास व खरेदी करण्यास मिळाल्या. अशा प्रतिक्रिया मुंबईकरांनी या प्रसंगी दिल्या. तसेच ग्रामीण भागातील अनेक गाव खेड्यातील महिलांना महालक्ष्मी सरस मार्फत एक खुलं व्यासपीठ तयार होत असल्याने लोकांची ह्या प्रसंगी जास्त ओढ दिसून आली.  रोज होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचाही आनंद मुंबईकरांनी घेतल्याचे पाहायला मिळाले. ”Food-lover” असणाऱ्या  मुंबईकरांचा धकाधकीच्या व्यस्त जीवनातून कुटुंब, मित्र मैत्रिणींसोबत अनेक खाद्यसंस्कृती एकाच ठिकाणी अनुभवयास मिळाले कोल्हापूरचा तांबडा-पांढरा रस्सा, खानदेशी मांडे, पिठलं भाकर, सावजी मटण, चिकन , सोलकडी व देशभरातून आलेल्या विविध खाद्य पदार्थांचा मुंबईकर मनसोक्त आनंद लुटताना पाहायला मिळाले सोबतच हस्तकला प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम यांची भर असतानाचा आनंद मुंबईकरांना होता.

स्टॉल धारक महिलांनीही महालक्ष्मी सरस विषयी त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करत असताना त्यांना ह्या निमित्ताने मुंबईतील बाजारपेठ खुली करून मिळते, तसेच मुंबईतून अनेक ग्राहक त्यांना ऑर्डर देत आहेत यासाठी समाधान व्यक्त केले आहे. सोबतच अनेक मुंबईतील व्यवसायिक ह्या ग्रामीण महिलांना अनेक स्तरावर मदत व व्यवसायात जोडून घेत असताना पाहायला मिळाले सोबतच काही व्यवसायिक त्यांना निर्यात करण्यास मदतही करण्याचे आश्वासन करताना पाहावयास मिळत आहेत.

स्टॉल धारक महिलांचा यशोगाथा टिपण्यास अनेक बातमीदार, व सोशल मीडिया वरील इन्फ्ल्यून्सर्स यांनी वेगवेगळ्या माध्यमांतून बचत गटातील महिलांचा गाथा प्रसिद्ध केल्या ज्यातील काही महिलांचा संघर्षांविषयी ऐकून लोकांनी येथे हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले, व त्यांना प्रोत्साहन दिले. ज्यामध्येही आवळा कॅंडीवाल्या ताई म्हणून प्रसिद्दी मिळविलेल्या ताई  ज्यांनी स्वतः संघर्षातून व्यवसाय उभा करत , परित्यक्त्या आणि निराधार महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला ज्यासाठी त्यांना जिल्हा विभाग आणि राज्यस्तरीय पुरस्कार मिळविला आणि नांदेड मधील काही आदिवासी महिला ज्यांचा बांबू हस्तकला यासाठी त्यांना राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते, असे एक-दोन नव्हे तर असंख्य उदाहरण ह्या प्रदर्शन व विक्री मध्ये पाहण्यास मिळाले.

महाराष्ट्रातील सिनेसृष्टीतील अनेक दिग्ग्ज कलाकारांनी, राजकीय मंडळींनी, सरकारी अधिकारी, कर्मचारी, ह्या प्रसंगी भेट देत त्यांचा प्रतिक्रिया देत मुंबईकरांना भेट देण्याचे आवाहन केले होते आणि त्यामुळेच ह्या प्रदर्शनाप्रसंगी लोकांची गर्दी ओसंडून पाहायला मिळाली. अशा ह्या उपक्रममुळे ग्रामीण भागातील महिलांना नक्कीच प्रोत्साहन मिळत असून त्यांना खऱ्या अर्थाने उद्योजक म्हणून एक नवी ”उमेद” मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here