वाढवण बंदरासंदर्भात मासेमारांच्या शंका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या दूर

0
6

मुंबई, 16 : पालघर जिल्ह्यातील प्रस्तावित वाढवण बंदरासंदर्भात मासेमार आणि आदिवासी बांधवांच्या विविध शंकांसंदर्भात आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याशी संवाद साधत त्यांच्या शंका दूर केल्या.

 आ. रमेश पाटील, विविध प्रशासकीय अधिकारी आणि पालघर, डहाणू आणि वाढवण बंदर परिसरातील नागरिक यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, वाढवण बंदर परिसरात किनारपट्टी भागात एकही गाव विस्थापित होणार नाही. हे बंदर समुद्रात होणार असल्याने भूसंपादनाची त्याला आवश्यकता नाही. केवळ रस्ते आणि रेल्वेसाठी जी जागा लागेल, त्यासाठी बाजारभावाप्रमाणे चौपट मोबदला देण्यात येईल. तसेच जे मासेमार प्रभावित होण्याची शक्यता आहे, त्यांचे योग्य पुनर्वसन करण्यात येईल. प्रकल्पबाधित मासेमारांच्या पुनर्वसनासंदर्भातील शासन आदेश यापूर्वीच जारी करण्यात आला आहे.÷ त्यांना महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या माध्यमातून मत्स्यसंवर्धनाची व्यवस्था निर्माण करुन देण्यात येईल.

या बंदरामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार असून, त्यात स्थानिकांनाच मोठ्या संख्येने रोजगार मिळेल, हे सुनिश्चित केले जाईल. मासेमारांच्या मुलांचे रोजगारासाठी कौशल्य प्रशिक्षण, हॉस्पीटल इत्यादी सुविधा इत्यादींकडे सुद्धा प्राधान्याने लक्ष दिले जाईल. या बंदरासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्यातच अत्याधुनिक फिशिंग हार्बरची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय, या भागात जेएनपीटीमार्फत विविध विकास कामे सुद्धा केली जावीत, असेच नियोजन करण्यात आले आहे. या भागातील नागरिकांच्या मनात असलेल्या शंका आणि त्यासंदर्भात राज्य सरकारने केलेल्या उपाययोजना याची एक पुस्तिकाच प्रकाशित करुन ती संबंधितांना देण्यात यावी, त्यामुळे कुणाच्याही मनात कोणती शंका राहणार नाही, असेही निर्देश देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी संबंधितांना दिले.

००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here