विशेष लेख : गर्भवती व बालकांच्या सुदृढतेसाठी “वात्सल्य”   

0
15

गरोदर मातेच्या आरेाग्याची काळजी घेतली, तर येणारे बाळ सुदृढ, निरोगी जन्माला येते. गरोदरपणाचा काळ हा खऱ्या अर्थाने मातेच्या आयुष्यातील काळजीचा काळ असतो.  पुढे निरोगी, सशक्त बाळाला जन्म देण्याचे मोठे आव्हान तिच्यासमोर असते. त्यामुळे मातेच्या गरोदरपणातील काळजी अत्यंत महत्वाची ठरते. गरोदरपणासोबतच बाळाच्या जन्मानंतर पहिले दोन वर्षे काळजीचे असतात. बाळाच्या सुदृढतेसाठी हा कालावधी महत्वाचा असतो. शासनाने या कालावधीचे महत्व अधोरेखित करीत गर्भधारणापूर्व माता व दोन वर्षापर्यंतच्या बालकांच्या  सुदृढ आरोग्यासाठी ‘वात्सल्य’ या नवीन उपक्रमाची सुरुवात केली आहे. जननक्षम माता (गर्भधारणेपूर्वीच्या), प्रसुतीपश्चात माता व दोन वर्षापर्यंतच्या बालकांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवांचे बळकटीकरण या उपक्रमातून करण्यात येणार आहे. प्रभावीपणे या उपक्रमाची अंमलबजावणी करून माता व बालकांचे सुदृढ आरोग्य ठेवण्यासाठी शासन काम करणार आहे.

प्रत्येक नागरिकाच्या सुदृढ आरोग्यासाठी आरोग्य मंत्री प्रा. डॉ. सावंत यांच्या संकल्पनेतून माता सुरक्षित-तर घर सुरक्षित अभियान, बालकांच्या आरोग्यासाठी जागरूक पालक-सुदृढ बालक तसेच पुरुषांच्या आरोग्यासाठी ‘निरोगी आरोग्य तरुणाईचे, वैभव महाराष्ट्राचे’ हे अभिनव उपक्रम  यशस्वीपणे राबविण्यात आले आहेत. या उपक्रमांना लोकसहभाग लाभला आहे, त्यामुळे हे उपक्रम यशस्वी ठरले आहेत. मेळघाट तसेच राज्यभरात दौरा करताना प्रा. डॉ. सावंत यांना गर्भधारणापूर्व मातांच्या समस्या लक्षात आल्या. याबाबत आरोग्य मंत्र्यांनी योजना राबविण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या होत्या. त्यानुसार ‘वात्सल्य’ ही नवीन योजना राज्यभरात लागू करण्यात येत आहे. याविषयीचा शासन निर्णयसुद्धा निर्गमित करण्यात आला आहे.

प्रसुतीदरम्यान माता मृत्यू आणि बाल मृत्यू कमी करण्यासाठी शासन विविध उपाययोजना राबवित आहे. तसेच  प्रसुतीनंतर माता व बाल संगोपनाच्या विविध योजनाही सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबविल्या जात आहेत. नव्याने सुरुवात करण्यात आलेल्या ‘वात्सल्य’ या उपक्रमाअंतर्गत महिलांच्या गर्भधारणेपूर्वी ते शिशू दोन वर्षाचे होईपर्यंत आवश्यक सर्व गुणात्मक आरोग्य सेवांचे व्यवस्थापन करण्यात आलेले आहे. या उपक्रमामध्ये प्रसुतीपूर्व आणि प्रसुतीपश्चात घटक महत्वाचे ठरविले आहे.  तसेच शिशु दोन वर्षाचे होईपर्यंत सर्व महत्त्वपूर्ण आरोग्य निर्देशांकावर सात्यत्यपूर्ण लक्ष ठेवून लाभार्थ्यांना आवश्यक आरोग्य सेवा मिळण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे जननक्षम जोडप्यांच्या आरोग्यामध्ये सकारात्मक बदल होवून कमी वजनाच्या बालकांच्या जन्माचे प्रमाण, जन्मताच व्यंग असलेल्या बालकांचे प्रमाण कमी होण्यास निश्चितच मदत होणार आहे. वात्सल्य उपक्रमात जननक्षम जोडपे व गर्भवती माता यांच्या आवश्यक चाचण्या करुन अतिजोखमीच्या मातांचे निदान होणार आहे. अशी जोडपी व गर्भवती माता त्यांच्यावर तातडीने उपचार केले जाणार आहेत. जन्मानंतर बालकांच्या 1 हजार दिवसापर्यंत वाढीचे मूल्यमापन करण्याकरिता आवश्यक सेवाही प्रदान केल्या जाणार आहे.

कमी दिवस आणि कमी वजन असलेल्या बाळांच्या जन्माचे प्रमाण कमी करणे, जन्मतः विकृती, उपजत मृत्यू प्रमाण कमी करणे, निरोगी गर्भधारणा आणि प्रसुतीसाठी माता आरोग्यात सुधारणा करणे, गर्भधारणेपूर्वीच मातेच्या आरोग्याची जोखीम ओळखणे व पाठपुरावा करणे, बालकाच्या हजार दिवसांच्या वाढीची सातत्यपूर्ण देखरेख करणे, हा हेतू वात्सल्य उपक्रम राबविण्यामागील आहे.

कुटुंब नियोजन साधन न वापरणारी असुरक्षित जननक्षम योग्य जोडपी, प्रसुतीपूर्व कालावधीतील माता आणि गरोदर महिलांच्या सहवासीत सोबत करणारी व्यक्ती, दोन वर्षाखालील शिशु या योजनेचे अपेक्षित लाभार्थी वात्सल्य उपक्रमातून असणार आहेत.

वात्सल्य उपक्रमातून निर्धारित आरोग्य सेवा

या योजनेंतर्गत प्राधान्याने गर्भधारणापूर्व आरोग्य तपासणी सेवांचा अंतर्भाव असून प्रचलित इतर आरोग्य कार्यक्रमांशी ही सेवा संलग्नित केलेली आहे. कुटुंब नियोजन साधन न वापरणारी असुरक्षित जननक्षम जोडप्यांची तपासणी, उपचार आणि समुपदेशन, माता व बालकांना आरोग्यासाठी असलेली जोखीम ही गर्भधारणा पूर्व, प्रसुतीदरम्यान आणि प्रसुतीनंतर कालावधीत ओळखणे व त्यांचे प्रभावी व्यवस्थापन, मातांची वजन वाढ आणि बालकांची योग्य वाढ यावर नियमित देखरेख, विशेष शिशू लक्ष जन्मतः तात्काळ स्तनपान, जन्म ते सहा महिन्यापर्यंत निव्वळ स्तनपान आणि सहा महिन्यानंतर योग्य पूरक आहार, बालकांच्या वजन वाढीच्या आलेखाद्वारे सनियंत्रण, आरोग्याचे इतर कार्यक्रम उदाहरणार्थ मा (MAA), दक्षता (DAKSHATA), एच.बी.एन.सी (HBNC), एच. बी. वाय. सी (HBNYC), पी. एम. एस. एम. ए (PMSMA), आर. के. एस. के (RKSK) आदी कार्यक्रमांचे समन्वय, माता आणि बालकांच्या आरोग्याच्या सुविधांचे बळकटीकरण करण्यासाठी आयसीडीएस, डब्ल्यू सी डी, आदिवासी विकास विभाग व इतर विभागांचा सहभाग असणार आहे.

०००००

–  नीलेश तायडे, विभागीय संपर्क अधिकारी

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here