महासंस्कृती महोत्सवाचे थाटात उद्घाटन

0
9

महासंस्कृती महोत्सवात आपली संस्कृती उजळून निघावी : अभिनेता अनासपुरे

बीड, दि.24 (जिमाका) :- तरुण पिढीला स्थानिक लोककलांची, खाद्य संस्कृतीची ओळख होण्यासाठी महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांनी आज महासंस्कृती महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी केले.

       पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, ग्रामविकास विभाग, कृषी विभाग व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महासंस्कृती महोत्सवाचे थाटात उद्घाटन छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण येथे झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते.

     यावेळी कार्यक्रमाचे उदघाटन सुप्रसिध्द सिने अभिनेते मकरंद अनासपुरे, पद्मश्री बशीर मामू, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संगीतादेवी पाटील, पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, विकास उपायुक्त सुरेश बेदमूथा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर, आत्माचे प्रकल्प संचालक सुभाष साळवे यांच्यासह अन्य मान्यवर मंचावर उपस्थित होते.

             महासंस्कृती महोत्सवाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते फीत कापून व दीप प्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी महिला स्वयंसहायता बचत गटातर्फे निर्मित विविध वस्तू व खाद्यपदार्थाच्या, कृषी विभागाकडून लावण्यात आलेल्या दालनाला मान्यवरांनी भेट देऊन माहिती जाणून घेतली. यावेळी विशेष सत्कार पद्मश्री शब्बीर मामू, यांच्यासह जागतिक स्तरावर खेळातील उत्कृष्ट कामगिरी केलेले ॲथलेटिक्स अविनाश साबळे, क्रिकेटर सचिन संजय धस, तायक्वांदो नयन अविनाश बारगजे व अविनाश पांचाळ आदि खेळाडू, प्रशिक्षक तसेच खेळाडूंच्या कुटुंबातील सदस्यांचा गौरव करण्यात आला. त्तपुर्वी शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथुन शोभायात्रा काढण्यात आली.

श्री. आर्दड पुढे म्हणाले की, आपला सांस्कृतिक वारसा हा येथे सर्व समाजातील या संस्कृतीचा पाया सशक्त असा आहे तो इथल्या खाण्या-पिण्यातून आणि जगण्यातून दिसतो. त्यामुळेच्या आपल्या आधीच्या पिढीतील लोक वागण्या बोलण्यातून संतुलित अशी असायची हीच लोप पावत असलेली सशक्त संस्कृती महासंस्कृती महोत्सवाच्या माध्यमातून पुन्हा लोकांसमोर उभी करण्याचा मानस आहे. या महोत्सवात लोक पावलेली खाद्य संस्कृती सोबतच लोककलांना प्रोत्साहन देण्यासाठी हा मंच शासनाने उभा करुन दिला आहे. अधिकाधिक लोकांनी या महोत्सवात येवून मनोरंजनासोबत खाद्य संस्कृती आणि लोककलांचा आनंद लुटावा असे आवाहनही त्यांनी केले.

महासंस्कृती महोत्सवात आपली संस्कृती उजाळून निघावी : अभिनेता अनासपुरे

  महासंस्कृती महोत्सवात आपली संस्कृती उजाळून निघावी, असे उदघाटनाप्रसंगी प्रमुख उदघाटक म्हणून लाभलेले सिने अभिनेता मकरंद अनासपुरे यावेळी म्हणाले. ते पुढे म्हणाले, स्थानिक उत्पादने खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल असला पाहिजे, बचत गटाच्या महिलांनी दर्जेदारपणे बनविलेले पिढी जात पदार्थ खरेदी करून त्याचा स्वाद घ्यावा. पूर्वी गावात निर्मित होणारा  माल गावातच विकला जायचा त्यामुळे स्थानिक व्यवसायांना उभारी मिळत असे.  त्यामुळे महासंस्कृती महोत्सवातील विविध स्टॉल वरील पदार्थ केवळ न बघता खरेदी करावीत. असे आवाहनही त्यांनी आवर्जून केले.

 आपला अंशतः सहभाग व्यवसाय उभारणीसाठी महत्त्वाचा आहे भगिनींचे प्रॉडक्ट विकत घेऊन त्यांचा व्यवसाय वाढवावा. तरी महासंस्कृती महोत्सवाचा उपक्रम अतिशय स्वागतार्ह आहे. असेही त्यांनी सांगितले. तसेच स्टॉलवरील स्वयंसहायता बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या खाद्यपदार्थाची आवर्जून खरेदी करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी केले.  बीड शहरात आगळावेगळा महा संस्कृती महोत्सव पुढील पाच दिवस छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर आयोजित करण्यात आलेला आहे. या महोत्सवासस्थानी कलाकारांना मंच तर व्यवसायिकांना स्टॉलची उभारणी करून देण्यात आलेली आहे. स्थानिक कलावंतांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी संधी देण्यात येणार आहे. महोत्सवात बीड जिल्ह्याचे नाव ज्यांनी उंचावर नेले अशा व्यक्तींचा सत्कार व सन्मान या ठिकाणी केला गेला. महोत्सवात 200 बचत गटांचे स्टॉल, कृषी स्टॉल लावण्यात आले असून शेतकऱ्यांनी व नागरिकांनी महासंस्कृती महोत्सवा उपस्थित रहावे, असे आवाहनही  जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी केले.

            कार्यक्रमाच्या सुरुवातीला  चंपावती विद्यालयातील विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले. तर यावेळी स्थानिक लोक कलावंतांनी यात कन्या भृण हत्या विरोधी  जाकरुकता पसरवणारा जोगवा, गोंधळ, वासूदेव, पोवाडा, आणि जागो हिंदुस्थानी ग्रुप यांचा देशभक्तीपर गीत गायनाचा कार्यक्रम अतिशय उत्साहात सादर करण्यात झाला.

०००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here