ठाणे येथे ६ व ७ मार्च रोजी कोकण विभागस्तरीय ‘नमो महारोजगार मेळावा’ – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

0
13

कोकण विभाग राज्यस्तरीय मेळाव्याच्या तारीख आणि ठिकाणामध्ये बदल

मुंबई, दि. २७ : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांमार्फत राज्यस्तरीय  कोकण  नमो महारोजगार विभागस्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा आधी दि. 24 आणि 25 फेब्रुवारी 2024 रोजी होणार होता. त्यानंतर ठाणे येथे होणारा मेळावा 29 फेब्रुवारी ते 1 मार्च रोजी होईल असे जाहीर केले होते. मात्र काही अपरिहार्य कारणास्तव या होणाऱ्या मेळाव्याच्या तारखांमध्ये बदल झाला आहे. हा मेळावा दि. 6 व 7 मार्च रोजी मॉडेला मिल कपाऊंड, वागळे इस्टेट ,चेक नाका ,ठाणे – ४००६०४ येथे होणार आहे, अशी माहिती कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली आहे.

मंत्री श्री.लोढा म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनातून कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागांमार्फत नोकरी इच्छुक युवक-युवती, तसेच नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी  कोकण विभागांतर्गत ठाणे, पालघर, रत्नागिरी,रायगड,सिंधुदुर्ग, मुंबई उपनगर, मुंबई शहर जिल्ह्यातील नोकरी इच्छुक युवक व युवतींकरिता  ‘नमो महारोजगार मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात स्टार्टअप एक्सपोचे देखील  आयोजन करण्यात आले असून ६ व ७ मार्च रोजी हा मेळावा सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत होईल. या मेळाव्यात नोकरी इच्छुक युवक-युवती यांनी मुलाखतीसाठी आणि महाएक्सपो मध्ये स्टार्टअप्स,इनवेस्टर्स व इनकुबेटर्स  या सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन, कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत करण्यात आले आहे.

या मेळाव्यात दहावी, बारावी,आय.टी.आय., पदविका,पदवीधर,पदव्युत्तर पदवी प्राप्त उमेदवारांच्या तेथेच मुलाखती घेवून  रोजगाराच्या संधी दिल्या जाणार आहेत.या मेळाव्यात नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. https://qr-codes.io/gdhSNd   किंवा www.rojgar.mahaswayam.gov.in  या लिंक वर उमेदवार नोंदणी व नोकरीकरिता अर्ज करून प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकतात. एकापेक्षा अधिक नोकरीसाठी देखील एकाच उमेदवाराला अर्ज करता येवून मुलाखती देत येतील.रोजगार मेळाव्यात सहभागी होणा-या उमेदवारांनी मेळाव्याच्या अगोदर ही नोंदणी करणे आवश्यक आहे.जे उमेदवार मेळाव्याच्या अगोदर नाव नोंदणी करतील त्याच उमेदवारांच्या मेळाव्याच्या दिवशी मुलाखती होणार आहेत. या माध्यमातून  दोन लाख युवक आणि युवतींना रोजगार देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यामुळे सर्व विभागांनी मिळून हा रोजगार मेळावा सर्वार्थाने यशस्वी करण्यासाठी कसून प्रयत्न करणे आवश्यक आहे.

कोकण विभागांतर्गत ठाणे, पालघर,रत्नागिरी,रायगड,सिंधुदुर्ग, मुंबई उपनगर, मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापनांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर उद्योजक नोंदणी करून रिक्त पदे अधिसूचित/जाहीर करणे आवश्यक आहे. याबाबत काही अडचण असल्यास संबंधित जिल्ह्यातील नोडल अधिकारी यांच्याशी किंवा 1800 -120 -8040 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

०००

संध्या गरवारे/विसंअ/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here