भविष्यातील वाहतुकीच्या गरजा लक्षात घेऊन उत्तम पायाभूत सुविधा देण्याचा प्रयत्न – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
10

नागपूर, दि. 14 :  नागपूर महानगरात ज्या गतीने विविध विकास कामे मार्गी लागली त्याच गतीने येथील नव्या भागात शहरीकरणही वाढले. चंद्रपूर-वर्धा आणि समृद्धी मार्गामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक वर्धा रोडवर मोठ्या प्रमाणात वाढली. भविष्यातील वाहतुकीच्या गरजा लक्षात घेऊन अतिशय योग्य वेळी चिंचभवन ते जामठा उड्डाणपुलाचे काम आपण हाती घेऊन विकासाला नवीन दिशा देत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. 44 च्या चिंचभुवन आरओबी ते जामठापर्यंतच्या 2.69 किलोमीटर लांबीच्या उड्डाणपुलासह रस्त्याच्या सहापदरीकरणाच्या कामाचे भूमिपुजन खापरी येथे आज करण्यात आले. कार्यक्रमाला आ. चंद्रशेखर बावनकुळे, आ. टेकचंद सावरकर, माजी आमदार सुधाकर कोहळे, स्थानिक लोक्रतिनिधींनी उपस्थित होते. प्रकल्पाची एकूण लांबी 5.74 किलोमीटर तर किंमत 620 कोटी रुपये असणार आहे.

वर्धा आणि चंद्रपूरकडे जात असलेल्या चिंचभवनपासून जामठ्यापर्यंत वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मिहान व इतर विविध प्रकल्पामुळे चिंचभवन, बुटीबोरी भागात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. वाढती लोकसंख्या लक्षात घेता सध्या उपलब्ध असलेल्या मार्गावर पर्यायी सुविधा उपलब्ध करणे आवश्यक होते. हा मार्गही निर्धारित वेळेत पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त करुन उत्तम पायाभूत सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, शहरात अनेक विकासकामे करण्यात आली आहेत. अनेक उड्डाणपूलांची तसेच रस्त्यांची निर्मिती करण्यात आली आहे.  रामटेकच्या रोपवे साठी निविदा निघाली आहे. नागपूर ते हैदराबाद एक्सप्रेस वे तयार होत आहे. दक्षिणेकडे जाण्यासाठी हा मार्ग महत्त्वपूर्ण ठरेल.  नागपूरपासून बुटीबोरी पर्यंत मेट्रोचे काम सुरू झाल्यामुळे बुटीबोरी ते कन्हान तसेच हिंगण्यापासून भंडारा रोडपर्यंत मेट्रो जाणार आहे. तसेच मिहानचा विस्तार रिंग रोडच्या पलीकडे करण्याचा प्रयत्न असल्याचे गडकरी म्हणाले.

0000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here