लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू आहे सर्व प्रचार व प्रसिद्धी साहित्याचे प्रदर्शन व प्रसारण तात्काळ थांबवावे  

0
16

मुंबई, दिनांक १८ : भारत निवडणूक आयोगाने देशभरात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची घोषणा केली असून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील शासकीय कार्यालयातील, सार्वजनिक मालमत्तेवरील व खाजगी मालमत्तेवरील बेकायदेशीर राजकीय प्रचार व प्रसिद्धीच्या साहित्याचे प्रदर्शन व प्रसारण थांबवण्याचे व अशा प्रकारची सामग्री तातडीने काढून टाकण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी दिल्या.

आज मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी संजय यादव  यांच्या अध्यक्षतेखाली आदर्श आचारसंहिते संदर्भात विविध शासकीय कार्यान्वयीन यंत्रणांची बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी बोलत होते.

या  बैठकीला अपर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी रवी कटकधोंड, उपजिल्हाधिकारी अधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्यामसूंदर सुरवसे, अप्पर जिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई शहरचे  उन्मेष महाजन,

बीएमसी, बेस्ट, आरोग्य, विद्यापीठ,महाविद्यालय, मुंबई शहर जिल्हाअंतर्गत असलेली सर्व शासकीय कार्यालयाचे प्रतिनिधी संबंधित अधिकारी उपस्थित होते.

दिनांक १६ मार्च २०२४ रोजी पासून पहिल्या २४ तासात सर्व शासकीय कार्यालयातील सर्व प्रचार प्रसिद्धीचे साहित्य, बॅनर्स, होर्डिंग्ज, काढण्यात यावेत. कोनशिला झाकण्यात याव्यात. पुढच्या 48 तासात सार्वजनिक मालमत्तांवरील राजकीय  प्रचार प्रसिद्धीचे साहित्य काढण्यात यावे.  पुढील ७२  तासात खाजगी मालमत्ता यावरील सर्व राजकीय प्रचार प्रसिद्धीचे साहित्य काढण्यात यावे, याची जबाबदारी सर्व संबंधित अधिकाऱ्यांची आहे. तसा  अहवाल अनुक्रमे 24, 48 व  ७२ तासात सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी सादर करून ७२ तासानंतर सर्व अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी सर्व प्रसार प्रसिद्धीचे साहित्य काढल्याबाबत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. तसेच संकेतस्थळावरील राजकीय व्यक्तींची छायाचित्रे काढुन शासकीय विश्रामगृहाचा वापरही नियंत्रित  करण्यात यावा. विविध विकास कामे सुरु असलेल्या कार्यान्वयीन यंत्रणांनी सुरु असलेल्या कामांची यादी आवक, जावक नोंदवहीच्या पानाच्या झेरॉक्स प्रतीसह निवडणूक विभागाला सादर करावी. अशा सूचना संजय यादव यांनी यावेळी दिल्या.

निवडणूकीच्या कामात आपल्या स्तरावर हलगर्जी होणार नाही याची सर्व संबंधितांनी काळजी घ्यावी. सर्व यंत्रणांनी निवडणूक आयोगांनी दिलेल्या निर्देशानुसार त्वरीत कार्यवाही करावी.

आदर्श आचारसंहितेचा काटेकोर पालन होईल याची दक्षाता घ्यावी. आपल्या भागात आचारसंहितेचा भंग होणार नाही यासाठी संबंधितांनी काळजीपूर्वक आपले कर्तव्य पार पाडावे.असेही संजय यादव यांनी यावेळी सांगितले.

00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here