पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी घेतला जिल्ह्यातील टंचाई परिस्थितीचा आढावा

0
10

 सांगली दि.१४ (जिमाका) : टंचाई परिस्थिती उद्भवलेल्या भागातील जनतेला पिण्याचे पाणी  उपलब्ध करून देण्यास  प्राधान्य द्यावे, अशा सूचना पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी  जिल्ह्यातील टंचाई परिस्थिती आढावा बैठकीत दिल्या.

पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्ह्यातील टंचाई परिस्थिती संदर्भात आढावा बैठक झाली. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महापालिका आयुक्त शुभम गुप्ता, अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख, नगर प्रशासन विभागाच्या सह आयुक्त पूनम मेहता, उपयुक्त समीक्षा चंद्राकर, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांच्यासह जिल्हास्तरीय यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

पुणे विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी सांगितले, जलसंपदा  विभागाने धरणातील पाणीसाठा  व उपसा सिंचन योजना मधील पाण्याचे योग्य नियोजन करावे. जिल्ह्यातील दुष्काळी भागातील लोकांना पुरेसे पाणी मिळावे म्हणून उपलब्ध पाण्याचे स्त्रोत निश्चित करावेत.

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सादरीकरणाद्वरे जिल्ह्यातील टंचाई परिस्थिती माहिती दिली. जिल्ह्यात सद्यस्थितीत ९८ टँकर सुरू असून यामध्ये जत तालुक्यात 86,  आटपाडी 11 आणि एक टँकर शिराळा तालुक्यात सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. शासन निकषानुसार दुष्काळ परिस्थिती जाहीर झालेल्या तालुक्यांमध्ये दुष्काळाच्या आठ उपाय योजना लागू करण्यात आल्याची माहिती देवून जिल्ह्यात सद्यस्थितीत आवश्यक चारा उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.

०००

माझी वसुंधरा अभियानाचा  विभागीय आयुक्तांकडून आढावा

जिल्ह्यात स्वच्छतेची मोहिम प्रभावीपणे राबवा  – पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

सांगली दि. १४ (जिमाका) : गावे व शहरे स्वच्छ व्हावीत, लोकांना स्वच्छतेची सवय जडावी, नागरिकांनी स्वच्छतेची जीवन पध्दती अंगीकारावी यासाठी जिल्ह्यात स्वच्छतेची मोहिम प्रभावीपणे राबवावी, अशा सूचना पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज दिल्या.

जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित बैठकीत पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी माझी वसुंधरा अभियानातील कामांचा आढावा घेतला.  बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महापालिका आयुक्त शुभम गुप्ता, अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख, नगर प्रशासन विभागाच्या सह आयुक्त पूनम मेहता, उपयुक्त समीक्षा चंद्राकर, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांच्यासह जिल्हास्तरीय यंत्रणांचे प्रमुख अधिकारी, गटविकास अधिकारी व नगरपालिकांचे मुख्याधिकारी उपस्थित होते.

डॉ.  पुलकुंडवार म्हणाले, नागरिकांना स्वच्छतेची सवय लागणे महत्वाचे आहे. स्वच्छतेमुळे पर्यावरण रक्षण व संवर्धन होते. माझी वसुंधरा अभियानात भूमि, जल, वायू, अग्नी आणि आकाश या पाच घटकांच्या माध्यमातून स्वच्छतेचे काम होत आहे. यामध्ये महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती आणि ग्रामपंचायतींनी सक्रीय सहभाग घेवून आपला भाग स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा. स्वच्छतेचा संदेश घरोघरी पोहोचविण्यासाठी शालेय विद्यार्थी महत्वाची भूमिका बजावतो. या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून घराघरात स्वच्छतेचा संदेश पोहचवावा.         स्वच्छतेसाठी ग्रामस्तरापर्यंत मजबूत टीम असावी. तहसिलदार, गटविकास अधिकाऱ्यांनी स्वच्छतेसंदर्भात नियमित बैठका घ्याव्यात. जिल्हास्तरावरून त्यांना योग्य ते मार्गदर्शन व मदत केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महापालिका आयुक्त शुभम गुप्ता, जिल्हा प्रशासन अधिकारी ज्ञानेश्वर ढेरे यांनी जिल्ह्यात त्यांच्या विभागामार्फत माझी वसुंधरा अभियानात सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.

०००

 

०००

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here