कराड विमानतळ विस्तारिकरणाची कार्यवाही कालबद्ध पद्धतीने पूर्ण करावी – राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई            

0
7

मुंबई, दि. ३० : कराड विमानतळाचे विस्तारीकरण करून सर्व सुविधांनी युक्त विमानतळ करायचे आहे. विमानतळासाठी आवश्यक असलेल्या जमीनीचे संपादन करून विमानतळ विकास कंपनीकडे जमीनीचा ताबा द्यावा. विमानतळ विस्तारीकरणासाठी निधी उपलब्ध असून कालबद्ध कार्यक्रम राबवून कराड विमानतळ विस्तारीकरणाची कार्यवाही पूर्ण करावी, असे निर्देश राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आज दिले.

मंत्रालयातील समिती कक्षात कराड विमानतळ विस्तारीकराबाबत बैठकीचे आयोजन उत्पादन शुल्क मंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे, अपर जिल्हाधिकारी तेजूसिंग पवार, प्रदीप पाटील उपस्थित होते. तर दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी सहभागी झाले होते.

मंत्री श्री. देसाई म्हणाले की, विमानतळ विस्तारीकरणासाठी वारूंजी येथील जमीन जवळ आहे. या जमिनीच्या संपादनासाठी खातेदार शेतकऱ्यांची संमती घ्यावी. यासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहाय्याने जमिनीचे संपादन करावे. भूसंपादनासाठी शिल्लक असलेल्या जमिनीबाबत 10 ऑगस्टपर्यंत कार्यवाही पूर्ण करावी. पुनर्वसन करावयाच्या नागरिकांना सोयी – सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात.

विमानतळ विस्तारीकरणामध्ये येत असलेल्या भैरवनाथ पाणी पुरवठा योजनेची जलवाहिनी वळवून घ्यावी. योजनेचे पाणी द्यायचे असून पाणीपुरवठा बंद करू नये. या पाणी पुरवठा योजनेच्या पूर्णत्वासाठी निधी उपलब्ध आहे. त्यामुळे योजनेच्या पाईप वळतीकरणाचे काम प्राधान्याने पूर्ण करावे,  अशा सूचनाही मंत्री श्री. देसाई यांनी दिल्या.

विमानतळासाठी 47.27 हेक्टर जमीन संपादनाची आवश्यकता आहे. त्यापैकी 43 हेक्टर जमिनीचा ताबा  विमानतळ कंपनीकडे देण्यात आला आहे.  तसेच 36.90 हेक्टर जमिनीचा मोबदला 861 खातेदार शेतकऱ्यांना देण्यात आला आहे, अशी माहिती यावेळी जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी दिली.

०००

निलेश तायडे/विसंअ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here