महिला सुरक्षिततेबाबत शैक्षणिक संस्थांमधून मोहीम राबवावी – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

0
9

मुंबई, दि. २६: बदलापूर घटनेप्रमाणे अल्पवयीन मुलींवरील अत्याचार हे निंदनीय आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी शासनस्तरावर विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. भविष्यात अशा घटना घडूच नये, यासाठी शैक्षणिक संस्थांमधून मुली व महिला सुरक्षिततेबाबत विशेष मोहिमेद्वारे उपाययोजना राबवाव्यात, अशा सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या.

विधानभवनातील समिती कक्षामध्ये महिला व मुलींवरील अत्याचार रोखण्यासाठी करावयाच्या उपाय योजनांबाबत बैठक झाली. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, परिवहन विभागाचे सह आयुक्त जितेंद्र पाटील, शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजन, नगर विकास विभागाच्या सहसचिव सुशीला पवार,महिला व बाल अत्याचार प्रतिबंध विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी शुभदा चव्हाण, गृह विभागाचे अवर सचिव अशोक नाईकवडे उपस्थित होते.

लहान मुलांसाठी  ‘गुड टच बॅड टच’ उपक्रम विस्तृत व प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश देत उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, मुलांच्या जनजागृतीविषयी असलेले साहित्य एकत्रित करावे. या साहित्यावर शालेय शिक्षण विभागाने उत्कृष्ट सादरीकरण बनवून शाळांमधून ते मुलांपर्यंत पोहचवावे. राज्यातील  81129 शाळांमध्ये सखी-सावित्री कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. उर्वरित शाळांमधून हा कक्ष तातडीने कार्यान्वित करण्यात यावा. कक्ष स्थापन करण्यात आलेल्या शाळांपैकी सुरूवातीला किमान 8 हजार शाळांपर्यंत जनजागृतीपर उपक्रम पोहोचविण्यात यावा.

मुले आणि मुलींच्या सुरक्षिततेबाबत शालेय शिक्षण विभाग,उच्च व तंत्र शिक्षण विभाग, परिवहन, ग्रामविकास व नगरविकास विभागाने वेळोवेळी शासन निर्णय निर्गमीत केले आहे. या शासन निर्णयांच्या अंमलबजावणीचे मूल्यमापन करावे. शासन निर्णय अंमलबजावणीतील अडचणीही लक्षात घ्याव्यात. मुलींच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने शाळांमध्ये स्वच्छतागृहापर्यंत ने-आण करण्यासाठी महिला सहायक, विद्यार्थी बस वाहतूकीमध्ये महिला परिचर नियुक्तीबाबत पडताळणी करावी. शाळांमधून सीसीटीव्ही कॅमेरे बसवून दर दोन ते तीन दिवसांनी कॅमेऱ्यांच्या रेकॉर्डींग्जची पडताळणी करावी. संबंधित विभागांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत हेल्पलाईन क्रमांक सुरु करावा. हेल्पलाईनवर तक्रारी करणे सोयीचे जाईल, असेही उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

संबंधित विभागांनी परिपत्रक जारी केल्यावर त्याबाबत झालेली जागरुकता ते कितपत गांभीर्याने घेतले जात आहे याबाबत नियमित मूल्यमापन केले जावे अशी यंत्रणा विकसित करावी. असे देखील यावेळी डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले. बस वाहतूक करणाऱ्या बसवर किंवा प्रवासी वाहनांवर, सर्व नियम पाळणाऱ्या वाहनावर सुरक्षित वाहन असे स्टीकर लावावे. स्टीकर दर्शनी भागात बसवर लावण्यात यावे. तसेच एसटी बसमधील मुलीं व महिलांशी गैरवर्तन रोखण्यासाठी साध्या वेशात महिला पोलीस असावेत यामुळे बसमधील मुली सुरक्षित प्रवास करू शकतील. शाळांच्या स्नेहसंमेलनांमधून जनजागृती करावी, तसेच  प्रदर्शने भरवावीत, विशेष कार्यक्रम करावेत अशा सूचनाही उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी दिल्या. संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी महिला व मुली यांचेवरील अत्याचार रोखण्यासाठी विभाग करत असलेल्या उपाययोजनेबाबत सविस्तर माहिती दिली.

०००

नीलेश तायडे/विसंअ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here