सोयाबीनसाठी यंदाचा हमीभाव गेल्यावर्षीपेक्षा २९२ रुपयांनी अधिक!

खरेदी केंद्रही सुरु, संख्या आणखी वाढणार

0
93

मुंबई, 6 ऑक्टोबर: आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी सोयाबीनचा हमीभाव हा ४८९२ रुपये इतका असून, तो गेल्यावर्षीपेक्षा २९२ रुपयांनी अधिक आहे. सोयाबीन खरेदीसाठी केंद्रही सुरु करण्यात आले असून, त्याची संख्या आणखी वाढवणार असल्याचे राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे.

राज्यात सन २०२४-२५ मधील खरीप हंगामातील सोयाबीनची मोठ्या प्रमाणात पेरणी झाली आहे. केंद्र शासनाने सन २०२४-२५ साठी सोयाबीन करिता प्रति क्विंटल रू. ४८९२/- इतका हमीभाव घोषित केला आहे. सदर दर मागील सन २०२३-२४ या वर्षाच्या हमीभावापेक्षा रू. २९२/- प्रति क्विंटल इतका जास्त आहे.

महाराष्ट्र राज्यातील खरीप हंगामातील सोयाबीन पिकाची केंद्र शासनाने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यात खरेदी सुरू करण्यासाठी  केंद्रशासनातील नाफेड व एन.सी.सी.एफ. तसेच राज्यातील सर्व प्रमुख नोडल एजन्सीची  राज्यस्तरीय आढावा बैठक पार पडली. सदर बैठकीमधील चर्चेनुसार  हंगाम 2024-25 मध्ये राज्यात केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभुत दरानुसार नाफेड व NCCF मार्फत प्रथमतः महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, मुंबई व विदर्भ पणन महासंघ नागपुर यांच्या वतीने राज्यात सोयाबीन खरेदीकरीता शेतकरी नोंदणी दिनांक 1/10/2024 पासुन सुरु करण्यात आली आहे.

केंद्र शासनाने नियुक्त केलेल्या नाफेड व एनसीसीएफ या दोन्ही  नोडल एजेन्सी सोबत संयुक्तपणे चर्चा करून सोयाबीन खरेदीकरीता राज्यात जिल्ह्यांची विभागणी करुन  नाफेड व एन.सी.सी.एफ . कार्यालयाने २६ जिल्ह्यांतील  एकुण २५६ खरेदी केंद्रांना सोयाबीन खरेदीची मंजुरी देण्यात आली असुन त्यापैकी २४२ खरेदी केंद्र कार्यान्वित झालेली आहेत. कार्यन्वित झालेल्या खरेदी केंद्रामार्फत निश्चित केलेल्या कालावधीत किमान आधारभूत किमतीवर सोयाबीन खरेदी लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

तरी सर्व शेतकरी बांधवांनी केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभुत दरानुसार सोयाबीन खरेदी योजनेचा लाभ घ्यावा. सदरील योजना ही शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा याकरीता राबविण्यात येत आहे. त्यामुळे सर्व शेतकऱी बांधवांनी सोयाबीन विक्रीकरीता आपल्या नाफेड/NCCF च्या नजिकच्या खरेदी केंद्रावर जावुन ७/१२उतारा, आधारकार्ड व बँकेचे पासबुक घेवुन प्रथम आपल्या पिकाची नोंदणी करुन घ्यावी व विक्री व्यवस्थापनाचे चांगल्या प्रकारे नियोजन व्हावे या दृष्टीने आपणास SMS प्राप्त झाल्यानंतर सोयाबीन विक्रीसाठी खरेदी केंद्रावर घेवुन यावा असे सूचित केलेले आहे. तसेच आजपर्यंत सुमारे ५००० शेतकरी बांधवांनी सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी केलेली असून याबाबत महाराष्ट्र राज्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी सदरील योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्य शासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here