भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार यामध्ये ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ स्थापन करण्यासाठी सामंजस्य करार  

राज्यातील शासकीय तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स व अन्य आधुनिक तंत्रज्ञानासाठी मिळणार चालना 

 नवी दिल्ली 11 :  केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या (MeitY) प्रशासकीय नियंत्रणाखालील स्वायत्त वैज्ञानिक संस्था असलेल्या राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था (NIELIT) आणि महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ यांच्यात केंद्राच्या उत्कृष्टता केंद्र उभारण्याकरिता सामंजस्य करार झाला आहे. या अंतर्गत राज्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आणि शासकीय तंत्रनिकेतन यांना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), रोबोटिक्स, इंटरनेट ऑफ थिंग्स (IoT), इंडस्ट्री 4.0, 3D प्रिंटिंग यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानांमध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी आणि संशोधनासाठी निधी उपलब्ध होणार आहे.

नवी दिल्ली येथील रेल्वे भवन येथे आज झालेल्या बैठकीत राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था (NIELIT) आणि महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालये व शासकीय तंत्रनिकेतनांमध्ये उत्कृष्टता केंद्र (CoE) स्थापन करण्यासाठी सामंजस्य करार (MoU) झाला. या कराराद्वारे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), रोबोटिक्स, इंटरनेट ऑफ थिंग्स (IoT), इंडस्ट्री 4.0, 3D प्रिंटिंगसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानांसाठी प्रशिक्षण आणि संशोधन केंद्रे उभारली जातील.

यावेळी रेल्वे, दूरसंचार, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री श्री. अश्विनी वैष्णव आणि महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण मंत्री श्री. चंद्रकांत (दादा) पाटील उपस्थित होते. यासोबतच तांत्रिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, आणि NIELIT चे महानिर्देशक डॉ. मदन मोहन त्रिपाठी, अभिषेक सिंग,अतिरिक्त सचिव उपस्थित होते.

या सामंजस्य करारानुसार, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून शासकीय तंत्रनिकेतन आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांसाठी संयुक्त प्रकल्प प्रस्तावाद्वारे निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था (NIELIT) या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी जबाबदार राहील. NIELIT शिक्षक व विद्यार्थ्यांना उद्योगांसोबत प्रशिक्षण कार्यक्रम, क्रेडिट कोर्सेस, आणि प्लेसमेंट सहाय्यता यांसारख्या सुविधा पुरवल्या जातील. या केंद्रांद्वारे विद्यार्थ्यांच्या रोजगाराच्या संधींमध्येही वाढ होईल.

या प्रसंगी श्री. चंद्रकांत (दादा) पाटील यांनी सदर उपक्रमाचा  शासकीय तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी  महाविद्यालयांमधील  विद्यार्थ्यांनाकरीता सेंटर फॉर एक्सलन्स  ही संकल्पना कार्यान्वित करणे हा मुख्य उद्देश  असून सदर सेंटर मार्फत  येणार अभ्यासक्रम राष्ट्रीय शैक्षणिक  धोरण 2020 शी सुसंगत असल्याचे सांगितले.

मा. केंद्रीय मंत्री श्री. अश्विनी वैष्णव  यांनी महाराष्ट्र राज्याला औद्योगिक  वारसा लाभलेला असून अद्यापपर्यंत विद्यार्थ्यांना सर्वागिण विकासाकरीता केंद्र सरकारच्या सहाय्याने  सदर उपक्रम  राबविणारे महाराष्ट्र हे  देशातील प्रथम राज्यआहे.  महाराष्ट्र राज्यामध्ये  यशस्वीरित्या अंमलबजावणी करुन पुढे  देशभरात  सदर उपक्रम राबविण्याचा केंद्र सरकारचा मानस असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

राज्यातील 40 शासकीय तंत्रनिकेतनांमध्ये यापूर्वीच 6 तंत्रनिकेतनांमध्ये इंटरनेट ऑफ थिंग्स (IoT),  क्षेत्रातील उत्कृष्टता केंद्राची स्थापना करण्यात आली आहे, तर 3 तंत्रनिकेतनांमध्ये रोबोटिक्स आणि ऑटोमेशन क्षेत्रात उत्कृष्टता केंद्रे कार्यरत आहेत. उर्वरित तंत्रनिकेतनांमध्येही उत्कृष्टता केंद्रे उभारण्याची योजना आहे, जी या कराराच्या माध्यमातून निधी उपलब्ध झाल्यावर पूर्ण केले जातील.

राज्यातील तंत्रशिक्षणाला एक नवी दिशा देणाऱ्या या सामंजस्य करारामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान आणि प्रशिक्षण मिळेल. याकरीता तांत्रिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, महाराष्ट्र राज्य तांत्रिक शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक  यांनी भारत सरकार व महाराष्ट्र शासनाचे आभार व्यक्त केले.

00000