मुंबई, दि. १०: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा उद्या दिनांक ११ फेब्रुवारी पासून सुरू होत आहेत. यानिमित्त शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
मंत्री श्री. भुसे म्हणतात, प्रिय विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, आपल्या शैक्षणिक प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे इयत्ता बारावीची परीक्षा. ११ फेब्रुवारी पासून सुरू होणाऱ्या या उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी राज्यभरातील १५,०५,०३७ विद्यार्थी ३,३७३ केंद्रांवर परीक्षेला सामोरे जाणार आहेत.
आपले कठोर परिश्रम आणि चिकाटीच्या कसोटीचा हा क्षण आहे. आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेवून शांत मनाने, नीट तयारी करून आत्मविश्वासाने परीक्षा द्या. परीक्षा म्हणजे केवळ गुण मिळवण्याची स्पर्धा नाही, तर आपली ज्ञानपातळी तपासण्याची संधी आहे.
शासन, प्रशासन, पालक, शिक्षक आणि संपूर्ण समाज तुमच्या पाठीशी आहे. त्यामुळे कोणताही तणाव न घेता, सर्वतोपरी प्रयत्न करून उत्तम कामगिरी करा.
तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
०००
बी.सी.झंवर/विसंअ/