‘अग्निशिखा’ ई व ऑडिओ बुकच्या माध्यमातून सुषमा स्वराज यांचा जीवन प्रवास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई दि. १३: सुषमा स्वराज अभ्यासू ,  व्यासंगी आणि चतुरस्त्र व्यक्तिमत्व होत्या. त्यांनी लोकसभा विरोधी पक्ष नेते, परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून खूप मोठे काम केले आहे.  त्या भारतीय राजकारणाला पडलेले स्वप्न आहेत. ‘अग्निशिखा : सुषमा स्वराज’ या ई आणि ऑडिओ बुकच्या माध्यमातून त्यांचे कार्य, जीवन प्रवास निश्चितच पुढच्या पिढीपर्यंत जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मेघदूत निवासस्थानी अग्निशिखा ऑडिओ व ई-बुकच्या प्रकाशनप्रसंगी व्यक्त केला.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सुषमा स्वराज यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री असताना पासपोर्ट आणि व्हिसाबाबत अनेक पद्धती लागू केल्या. अनेक देशांशी त्यांनी केलेल्या करारांमुळे आज आपल्याला त्या देशांचा व्हिसा मिळत आहे.  त्यांनी केलेल्या ‘रिफॉर्म’मुळे आज पासपोर्ट मिळणे सोपे झाले आहे. लोकसभेत विरोधी पक्षनेतेपदी असताना त्यांनी तत्कालीन सरकारच्या कारभारावर केलेले अभ्यासपूर्ण विवेचन त्याकाळी खूप गाजले.  त्यांचा व्यासंग,  विषयाची हाताळणी,  प्रचंड बुद्धिमत्तेसोबत असलेली स्मरणशक्ती ही त्यांची ओळख द्यायला पुरेशी आहे.

त्यांचा विविध भाषांचा अभ्यास, त्यांच्यामध्ये भाषेचे असलेले सौंदर्य ओळखण्याची विशेष कला होती. सुषमा स्वराज कधीही बोलताना समोर कागद ठेवत नव्हत्या.  हे त्यांचे वैशिष्ट्य होते. त्यांची अभ्यासपूर्ण भाषणे आजही मार्गदर्शक ठरत आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुषमा स्वराज यांच्या कार्याचा गौरव केला.

मेधा किरीट लिखित पुस्तकाचे ऑडिओ बुक व ई-बुक प्रकाशन मराठीसह हिंदी व इंग्रजी या तीन भाषांमध्ये करण्यात आले आहे. डिजिटल माध्यमातून पुस्तकाची निर्मिती झंकार स्टुडिओ, पुणे येथे झाली आहे. या कार्यक्रमाला माजी खासदार किरीट सोमय्या, मराठी अभिवाचक तनुजा राहणे, ईबुक पुस्तक रचनाकार स्वाती जोशी, हिंदी अभिवाचक दिव्या शारदा, झंकार चे संचालक सत्यजित पंगू आणि आनंद लिमये उपस्थित होते.

०००