अभिजाततेचा गौरव मिरवणाऱ्या मराठी भाषेचा आणि तिच्या समृद्ध साहित्यपरंपरेचा भव्य उत्सव म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मराठी भाषा ही केवळ संवादाचे साधन नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रवासियांचे हृदयस्पंदन आहे. यावर्षी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नवी दिल्लीत होत आहे, हे संमेलन मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीसाठी एक ऐतिहासिक क्षण ठरणार आहे.
मराठी भाषा – परंपरा आणि आधुनिकतेचा संगम
मराठी भाषेचा प्रवास हा केवळ काही शतकांचा नाही, तर तो संस्कृती, इतिहास, साहित्य, विचारधारा आणि चळवळी यांचा जाज्वल्य इतिहास आहे. शिवकालीन युद्धनीती असो, संतवाङ्मयातील अध्यात्म असो, की लोकमान्य टिळक, सावरकर यांच्या लेखणीतील क्रांतीचा हुंकार—मराठीने प्रत्येक युगात आपली छाप सोडली आहे. आजही ही भाषा डिजिटल युगात नव्या वाटा शोधत व्यपक रूप धारण करत आहे.
संत साहित्य आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचा पाया
मराठी भाषेच्या समृध्दीचा पाया संतांनी घातला. संत ज्ञानेश्वरांनी संस्कृतातील गीतेचे तत्त्वज्ञान मराठीत आणत ज्ञानेश्वरी रचली. संत ज्ञानेश्वरांनी मराठीची महती सांगताना अभिमानाने म्हटले “माझ्या मराठीचिया बोलू कवतुके, परि अमृतातेही पैजा जिंके!” . संत तुकारामांच्या अभंगांमध्ये समाजमन घडवण्याचे सामर्थ्य आहे, तर समर्थ रामदासांच्या लेखणीत राष्ट्रवादाची चेतना. या संतवाणीने केवळ धर्मप्रसार केला नाही, तर मराठी मनाच्या विचारसरणीला एक नवा आयाम दिला.
इतिहास, काव्य, कथा आणि क्रांती – मराठी साहित्याचा अविरत प्रवास
मराठी साहित्य हे केवळ संतवाणीपुरते सीमित राहिले नाही. सुरेश भटांच्या गझल, किर्तनसंस्कृती, लोककथांपासून ऐतिहासिक चरित्रांपर्यंत, नाटकांपासून विज्ञान-तंत्रज्ञाना परंपरेपर्यंत मराठी साहित्याने विविध अंगांनी समृद्धी मिळवली आहे. लोकमान्य टिळक यांच्या अग्रलेखांनी स्वातंत्र्यलढ्याला धार दिली, विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी मराठी साहित्याला नवचैतन्य दिले, तर पु. ल. देशपांडे यांनी आपल्या मिश्कील लेखणीतून मराठीला वेगळीच उंची दिली. वि. स. खांडेकर, रणजीत देसाई, शिवाजी सावंत यांच्या साहित्याने इतिहास आणि समकालीन समाजजीवनाचे दर्शन घडवले. आज, मराठी साहित्य नवनव्या वाटा शोधत आहे—किंडलवर पोहोचत आहे, पॉडकास्टच्या माध्यमातून ऐकले जात आहे, आणि सोशल मीडियावर चर्चिले जात आहे ही बाब उल्लेखनीय आहे.
दिल्लीतील साहित्य संमेलन – ऐतिहासिक सोहळा
यावर्षी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे होत आहे, आणि या संमेलनाला अनेक कारणांमुळे ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. केंद्र सरकारकडून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर होणारे हे पहिले साहित्य संमेलन आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणारे उद्घाटन हा अभिमानाचा क्षण असेल. संपूर्ण भारतभर आणि जगभर पसरलेल्या मराठी भाषिकांसाठी हे संमेलन प्रेरणादायी ठरेल.
भविष्यातील वाटचाल – मराठी भाषा आणि तिचे जतन
मराठी भाषा ही केवळ भूतकाळाचा गौरव नसून, भविष्यासाठीची शिदोरी आहे. डिजिटल क्रांतीच्या युगातही मराठी साहित्य नवनवीन प्रयोगांमधून पुढे जात आहे. ब्लॉग, पॉडकास्ट, ऑडिओबुक्स, वेब सिरीज—या सर्व माध्यमांतून मराठी भाषा नव्या पिढीपर्यंत पोहोचत आहे.
९८ वे साहित्य संमेलन हे केवळ एक सोहळा नाही, तर मराठीच्या उज्ज्वल भविष्यासाठी घेतलेली प्रतिज्ञा आहे. आपण सर्वांनी मिळून ही भाषा जपली पाहिजे, तिचा सन्मान केला पाहिजे, आणि तिच्या वृद्धीसाठी योगदान दिले पाहिजे.
चला तर मग, माय मराठीच्या श्रीमंतीचा आणि साहित्याच्या भव्यतेचा हा सोहळा साजरा करूया!
– वर्षा फडके- आंधळे
वरिष्ठ सहायक संचालक (माहिती)
000