महिला आत्मनिर्भरतेचा “नागपूर पॅटर्न”- सचिव डॉ. अनुपकुमार यादव

मुंबई, दि. १९ : राज्यातील महिलांचा आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक स्तर उंचावून त्यांना सन्मानपूर्वक जीवन जगता यावे यासाठी महिला व बाल विकास विभाग सतत प्रयत्नशील आहे. नागपूर मधील ३ हजार महिलांनी एकत्र येऊन ३० लाख रुपयांचा निधी जमा केला आहे. महिला आर्थिक विकास महामंडळ या महिलांना उद्योग सुरू करण्यास मदत करणार असून, यासाठी शासन त्यांना सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याची माहिती विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव यांनी दिली आहे.

डॉ.अनुपकुमार यादव म्हणाले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेणाऱ्या नागपूर मधील महिलांनी एकत्र येत नागपूर महिला सन्मान क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना केली आहे. 3 हजार महिला या 30 लाख रुपये निधीतून स्वतः छोटे उद्योग सुरू करणार आहेत. तसेच दुसऱ्या महिलांनाही या पैशातून छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल देत आहेत. एखादी दुर्घटना घडली तर मदत करत आहेत. भांडवलावर मिळणा-या व्याजावर ही सोसायटी पुढे कार्यरत राहणार आहे. अशा पद्धतीने ज्या महिला पुढे येतील त्यांच्यासाठी महिला व बाल विकास विभाग “सपोर्ट सिस्टिम” देखील उभी करणार आहे. महिला व आर्थिक विकास महामंडळामार्फत (माविम) या महिलांना सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे डॉ.अनुपकुमार यादव यांना सांगितले.

ग्रामीण अर्थव्यवस्थेला मदत

महिला काटकसर करून आपल्या घरच्या गरजा पूर्ण करत असते. किराणा सामान भरणे मुलांची फी किंवा औषधे यांच्यावरच पैसे खर्च होत असतात. या योजनेतील लाभार्थी ग्रामीण क्षेत्रातील जास्त प्रमाणावर आहेत.  किराणा सामान तसेच इतर छोट्या-मोठ्या दुकानदारांकडे खरेदी होत असल्याने गावातल्या छोट्या व्यापा-यांना देखील याचा अपरोक्ष लाभ होतो. महिला व आर्थिक विकास महामंडळामार्फत (माविम) सुमारे १.५ लाख व महाराष्ट्र ग्रामीण जीवनोत्ती अभियानामार्फत सुमारे ६ लाख याप्रमाणे सुमारे ७.५ लाख महिला बचत गट ग्रामीण भागामध्ये काम करत आहेत. या बचत गटांच्या माध्यमातून एकत्रित येऊन निधी उभा करुन महिलांना विविध उद्यमशील उपक्रम राबविण्यास सदर योजनेमूळे शक्य होत आहे. या सर्व बाबींमुळे ग्रामीण भागामध्ये निधीचा इनफ्लो वाढणार असून ग्रामीण भागामध्ये सर्क्यूलर अर्थव्यवस्थेस चालना मिळून ती बळकट होईल. त्यामुळे ग्रामीण भागामध्येच गरजांची पूर्तता होणार असल्याने शहराकडे होणारे स्थंलातरण थांबण्यास मदत होईल असे डॉ.अनुपकुमार यादव यांनी सांगितले आहे.

गरजवंताना सहाय्य

राज्यातील ग्रामीण भागातील तसेच आदिवासी भागामधील, त्याचप्रमाणे शहरातील (गरीब महिलांना) झोपडपट्टी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ प्रामुख्याने मिळत आहे. अशा प्रकारे समाजातील गरजू महिलांचा या योजनेमध्ये समावेश आहे. या योजनेमूळे त्यांची आर्थिक उन्नती होऊन त्या आर्थिकद्ष्टया सक्षम होतील.

महिला सदर योजनेच्या अटी शर्तीनसुार काही लाभार्थी अपात्र असल्याने त्या स्वत:हून लाभ परत करत आहेत. अशा प्रकारे या योजनेकरिता अपात्र असलेल्या इतर लाभार्थी महिलांना स्वत:हून लाभ परत करावयाचा असल्यास अथवा यापुढे त्यांना लाभ नको असल्यास त्याबाबत सूविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

000

श्रध्दा मेश्राम/विसंअ