मुंबई, दि. २०: राज्यात आधार सेवा केंद्रांची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढत आहे. महानगरांपासून अगदी दुर्गम खेड्यांपर्यंत, नागरिकांना आधार नोंदणी आणि अद्ययावत सेवा मिळण्याचा मार्ग सुकर झालेला आहे. प्रत्येक नागरिकापर्यंत डिजिटल सेवा पोहोचविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. 2911 नवीन आधार नोंदणी किट्स खरेदी केल्याने डिजिटल दरी दूर होऊन सर्वसामान्य नागरिकांना अत्यावश्यक सेवा सहजपणे उपलब्ध होणार असल्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले.
सह्याद्री अतिथीगृह येथे मंत्री ॲड.शेलार यांच्या हस्ते मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे आणि रायगड येथील ग्रामस्तरीय उद्योजकांना (Village Level Entrepreneur VLEs ) नवीन आधार किटस्चे वितरण करण्यात आले. यावेळी माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव पराग जैन नैनुटिया, माहिती तंत्रज्ञान संचालनालयाचे संचालक अनिल भंडारी, मुंबई जिल्हा उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, मुंबई शहरचे उपजिल्हाधिकारी गणेश सांगळे, मुंबई उपनगरचे अपर जिल्हाधिकारी सुभाष काकडे, कक्ष अधिकारी मुकेश सोमकुंवर, आधार सल्लागार अमित बाजपेयी, अनुराग मित्तल, प्रकल्प अधिकारी विजय पाटील, आदी उपस्थित होते.
मंत्री ॲड. शेलार म्हणाले की, विशेषतः आधार कार्ड नोंदणी आणि प्रमाणिकरण प्रक्रियेला गती देण्यासाठी पुढच्या एका महिन्याच्या कालावधीत शून्य ते पाच वयोगटातील मुलांचे आधार नोंदणी आणि अनिवार्य बायोमेट्रिक अद्यतन प्रक्रिया वाढवणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेस एक लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. मतदानाचा अधिकार संविधानाने दिलेला आहे. या पवित्र भावनेने आणि जबाबदारीने ग्रामस्तरीय उद्योजकांना काम करावे अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
महाराष्ट्र आधार नोंदणी आणि प्रमाणीकरणामध्ये आघाडीवर आहे. ही गोष्ट खरच अभिमानाची आणि समाधानाची बाब आहे. राज्यात कार्यरत असलेल्या 6,700 आधार किट्सपैकी 2,700 किट्स केवळ माहिती तंत्रज्ञान संचालनालया तर्फे व्यवस्थापित केल्या आहेत. त्यामुळे आधार सेवा पुरवठादारांमध्ये राज्य आघाडीवर आहे. आज 2,911 नवीन आधार नोंदणी किट्स वितरित केल्या जात असून, त्यामुळे आधार सेवा देण्याची क्षमता लक्षणीयरीत्या वाढेल. या किट्समुळे महानगरी भागांपासून अगदी दुर्गम गावांपर्यंत प्रत्येक नागरिकाला आधार नोंदणी आणि अद्ययावत सेवा सहज मिळणार आहेत. डिजिटल सेवांची गती वाढवण्याच्या दृष्टीने शासन विविध योजनांची अंमलबजावणी करत आहे.
डिजिटल सेवांचा प्रसार आणि जनतेपर्यंत त्यांचा सहज आणि सुरक्षित वापर वाढाविण्यासाठी अनिवार्य बायोमेट्रिक अद्यतन प्रक्रिया महत्वाची आहे. यामध्ये नागरिकांनी जास्तीत जास्त सहभाग वाढवणे अपेक्षित आहे. यामुळे डिजिटल आधार सेवांचा जलद विस्तार होणार असून, नागरिकांना त्याचा अधिक लाभ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शिल्पा नातू यांनी प्रास्ताविक करुन आभार मानले.
०००
अश्विनी पुजारी/स.सं