मुंबई, दि. ०१: भारतीय निवडणूक आयोगाने देशभरात मतदार नोंदणी अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या स्तरावर राजकीय पक्षांसोबत संवाद साधण्याची मोठी मोहीम राबवली. आतापर्यंत एकूण २५ दिवसांच्या कालावधीत आणि ३१ मार्च २०२५ पर्यंत, देशभरामध्ये एकूण ४,७१९ बैठका घेण्यात आल्या आहेत. यामध्ये मुख्य निवडणूक अधिकारी यांनी ४० बैठका, जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी ८०० आणि मतदार नोंदणी अधिकारी यांनी ३,८७९ बैठका घेतल्या, ज्यामध्ये देशभरातील २८ हजारांहून अधिक राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला.
या बैठका ४-५ मार्च २०२५ रोजी आयआयआयडीईएम IIIDEM, नवी दिल्ली येथे झालेल्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या परिषदेच्या दरम्यान, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंह संधू व डॉ. विवेक जोशी यांनी दिलेल्या निर्देशांनुसार आयोजित करण्यात आल्या.
लोकप्रतिनिधित्व कायदा १९५० व १९५१, मतदार नोंदणी नियम १९६०, निवडणूक संचलन नियम १९६१ आणि मॅन्युअल्स, निवडणूक आयोगाने वेळोवेळी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वे व निर्देश यांच्यानुसार सबंधित अधिकाऱ्यांकडून प्रलंबित प्रकरणांचे निराकरण करणे हा या संवाद बैठकींचा उद्देश होता. सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून कृती अहवाल मागवण्यात आला असून, कायदेशीर चौकटीत न सोडवता आलेले कोणतेही मुद्दे आयोगाच्या स्तरावर घेतले जातील.
विधानसभा मतदारसंघ, जिल्हे आणि राज्य/केंद्रशासित प्रदेश स्तरावरील संवाद बैठकीत राजकीय पक्षांचा सकारात्मक सहभाग दिसून आला, असे भारत निवडणूक आयोगाने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
०००
संजय ओरके/विसंअ/