पहलगाम हल्ला : मृत पर्यटकांच्या नातेवाईकांशी, अडकलेल्या पर्यटकांसाठी आणि राज्य प्रशासनाशी महाराष्ट्र सदन सतत संपर्कात

नवी दिल्ली, 23 : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या पार्थिवांची व्यवस्था आणि जखमींच्या मदतीसाठी, महाराष्ट्र सदन सक्रियपणे कार्यरत आहे. जम्मू-काश्मीर प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृतांपैकी चार पार्थिव मुंबईला, तर दोन पार्थिव पुण्याला दिल्लीमार्गे पाठविण्यात येणार आहेत. तसेच नातेवाईकांशी महाराष्ट्र सदन येथील राजशिष्टाचार विभागातील अधिकारी सतत संपर्कात आहेत.

या हल्ल्यात जखमी झालेले चार पर्यटक सुखरूप असून, त्यांच्याशी संपर्क साधण्यात आलेला आहे. तसेच, जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या इतर पर्यटकांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत 308 पर्यटकांशी संपर्क साधला गेला आहे. स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधून या पर्यटकांच्या निवास आणि पुढील प्रवासाची व्यवस्था करण्यात येत आहे.

महाराष्ट्र सदन सर्वतोपरी मदत आणि समन्वयासाठी कटिबद्ध असल्याचे महाराष्ट्र सदनातील निवासी आयुक्त कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000000

अमरज्योत कौर अरोरा/ वि.वृ.क्र.91 /दि.23.04.2025