मुंबई, दि. 24 : अवयवदानास नवे आयाम मिळत असून राज्यातील अवयवदान आणि प्रत्यारोपण प्रक्रियेला अधिक गती मिळत आहे. तसेच अवयवदान प्रक्रियेत असलेली पारदर्शकता आणि परिणामकारतेमुळे अधिकाधिक गरजू रुग्णांना जीवनदान देता येणार आहे, असे मत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केले.
आरोग्य भवन येथे आरोग्यमंत्री श्री.आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली अवयव प्रत्यारोपणविषयी बैठक झाली. या बैठकीस आमदार श्रीमती देवयानी फरांदे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव डॉ.निपुण विनायक, आरोग्य सेवा संचालक डॉ.नितीन अंबाडेकर, वैद्यकीय शिक्षण सहसंचालक डॉ.पल्लवी सापळे, वैद्यकीय अधिकारी, मानवी अवयव प्रत्यारोपण तसेच विधी व न्याय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
आरोग्यमंत्री श्री. आबिटकर म्हणाले की, अमरावती, कोल्हापूर, नाशिक आणि सोलापूर येथे नवे प्रादेशिक अवयव प्रत्यारोपण समन्वय केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये मानवी अवयक पुनर्प्राप्ती केंद्रांची निर्मिती(NTORC) आणि त्या ठिकाणी समन्वयकांची नियुक्ती करण्यात येईल. अवयव प्रत्यारोपणासाठी आवश्यक रुग्णालय नोंदणी प्रक्रियेचा तातडीने निर्णय येईल. तसेच विभागीय प्राधिकरण समित्यांकडून (RAC) जिवंत अवयवदान परवानगी प्रक्रियेला सुलभ करण्यात येत आहे, असेही श्री. आबिटकर यांनी सांगितले.
अवयवदात्यांचा महाराष्ट्र दिनी सत्कार
अवयवदानासाठी जनजागृती, सन्मान व सामाजिक सहभाग असल्याने राज्यभर जनजागृती मोहीम राबवून जनतेत अवयवदानाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण करावे. 1 मे महाराष्ट्र दिनी, जिल्हास्तरावर अवयवदाते आणि त्यांच्या कुटुंबीयांचा पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे. अवयव प्रत्यारोपण करणाऱ्या डॉक्टर आणि समन्वयकांसाठी कार्यशाळा आयोजित केल्या जातील. ‘फेलोशिप इन क्रिटीकल मेडीसीन’ हा पदव्युत्तर अभ्यासक्रम वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत तात्काळ सुरू केला जात आहे. अतितातडीच्या परिस्थितीत अवयवदान व शवविच्छेदन प्रक्रियेत समन्वय साधण्यासाठी आवश्यक सुधारणा करण्याची सूचनाही आरोग्यमंत्री श्री.आबिटकर यांनी यावेळी केली.
0000
संजय ओरके/विसंअ