नाविण्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या ग्राम महसूल अधिकाऱ्यांचा गौरव करणार – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 महसुलमंत्री, पालकमंत्र्याच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान व सेवा हक्क दिन

धुळे, दि. २८ (जिमाका):  महसूल विभाग हा शासनाचा चेहरा असून सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याची भूमिका राबविण्याबरोबर सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान सुकर होण्यासाठी विविध नाविण्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या ग्राम महसूल अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

महसूलमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते धुळे जिल्हा प्रशासनाच्यावतीने कै. कर्मवीर भाऊसाहेब हिरे भवन येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान व सेवा हक्क दिनानिमित्त सेवा प्रमाणपत्र वितरण पार पडले, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास पणन व राजशिष्टाचार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, खासदार डॉ. शोभा बच्छाव, आमदार सर्वश्री काशिराम पावरा, श्रीमती मंजुळा गावीत, अनुप अग्रवाल, माजी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश शेलार, उपजिल्हाधिकारी संदीप पाटील, उपविभागीय अधिकारी रोहन कुवर, शरद मंडलीक आदी उपस्थित होते.

महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले की, महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान सुकर होण्यासाठी यापुढे प्रत्येक महसुल मंडळात वर्षांत चारवेळा महाराजस्व अभियान राबविण्यात यावे. अॅग्रीस्टॅकमुळे शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ शेतकऱ्यांच्या खात्यावर मिळणार असल्याने जिल्ह्यात अॅग्रीस्टॅकची 100 टक्के नोंदणी पुर्ण करावी. ग्राम महसूल अधिकाऱ्यापासून महसूल मंत्री हे एका परिवारातील असल्याने नाविण्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या महसूल अधिकारी, कर्मचारी यांचा गौरव करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. जिवंत सातबारा हा उपक्रम चिखलीचे तहसिलदार यांच्या अभिनव उपक्रमातून पुढे आलेला उपक्रम असल्याचे सांगून जे महसूल अधिकारी, कर्मचारी नाविण्यपूर्ण उपक्रम राबवतील त्यांचा येत्या काळात गौरव करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

लवकरच राज्यातील प्रत्येक मंजूर घरकुल धारकांना 5 ब्रास रेतीची रॉयल्टी घरपोच देणार असून तलाठी ते अपर जिल्हाधिकारी पदाच्या पदोन्नतीचे एकही प्रकरण प्रलंबित ठेवणार नाहीत. तसेच जिल्ह्यात चांगला उपक्रम राबविल्यास तो संपूर्ण राज्यात पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविण्यात येईल. धुळे जिल्ह्यात चांगले काम होत असल्याने जिल्हा प्रशासनाचे कौतुक करुन राज्याच्या महसूल विभागात धुळे जिल्हा हा राज्यात प्रथम क्रमांकावर राहावा, असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

पालकमंत्री रावल म्हणाले की, राज्यात सर्वसामान्य जनतेचं राज्य आहे. सामान्य माणसाला त्यांचे हक्क देण्याचे काम हे सरकार करीत आहेत. महाराजस्व अभियान हा उपक्रम एक दिवसापुरता मर्यादित राहू नये. वर्षभर हा उपक्रम सुरू ठेवून सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचे काम होणे अपेक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत पोलीस पाटील सेवा अभिलेख प्रणालीचे लोकार्पण,  मंडळस्तरावरील ई-ऑफिस प्रणालीचे लोकार्पण, भूमिअभिलेख विभाग ऑनलाईन सेवा पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब अनुदान वाटप, जिवंत सातबारा वाटप मोहीम, अॅग्रीस्टक योजनेतंर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना फार्मर आयडी वाटप, प्राधान्य कुटूंबातील, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी निराधार योजना अनुदान वाटप, उत्पन्न दाखला, जातीचा दाखला, वनहक्कधारक लाभार्थीना वनहपट्टांचे प्रातिनिधीक स्वरुपात वाटप यावेळी करण्यात आले. तर उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

 

सर्व उपस्थितांना सेवा हक्क हमी कायद्याची शपथ देण्यात आली.

०००