प्रत्येक मंडळात महाराजस्व अभियान राबविणार -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

अमरावती, दि. २८ : राज्य शासनाने पारदर्शी आणि गतीमान सरकारचे धोरण ठरविले आहे. शासकीय कार्यालयातील कामे सहजपणे आणि विनातक्रार होण्यासाठी यंत्रणा राबविण्यात येत आहे. नागरिकांच्या आवश्यक कामांसाठी आता प्रत्येक मंडळात महाराजस्व अभियान राबविण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे आज उद्घाटन करण्यात आले. यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार रवि राणा, प्रविण तायडे, राजेश वानखडे, नवनीत राणा, सुनिल देशमुख, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री बावनकुळे यांनी नागरिकांचे जीवनमान सुकर करण्यासाठी विविध पावले उचलण्यात येत आहे. नागरिकांचे कामे प्रामाणिकपणे करून न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मंडळ स्तरावर होणाऱ्या महाराजस्व अभिनायात आलेल्या नागरिकांच्या अर्जावर त्याच ठिकाणी निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आला आहे. जनतेचे कल्याण करण्याचा संकल्प करण्यात आला असून प्रशासनाचे सहकार्य यात घेतले जात आहे.

नागरिकांचा शासनावरील विश्वास वाढविण्यासाठी महाराजस्व अभियान राबविण्यात येत आहे.अमरावतीच्या विकासासाठी विविध प्रकल्प राबविण्यात येत आहे. अमरावती विमानतळ आणि त्याची धावपट्टी वाढविणे, पायलट प्रशिक्षण केंद्र, आयटी पार्क, पीएम मित्रा टेक्सटाईल पार्क येत्या काळात पूर्ण करण्यात येतील. त्यासोबतच येत्या काळात पिण्याच्या पाण्याची योजना पूर्ण करून अमरावतीला पुढील 50 वर्षे पाणी पुरेल याची व्यवस्था करण्यात येईल. तसेच जाहिरनाम्यात दिलेले शेतकऱ्यांना मोफत वीज, लाडकी बहीण आदी योजनांच्या अंमलबजावणीसोबत मेळघाटातील रस्ते जोडणीचा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी खासदार डॉ. बोंडे, रवि राणा यांनी मनोगत व्यक्त केले. तहसिलदार विजय लोखंडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी बचतगटांना स्वनिधी, ट्रॅक्टर, कृषी अवजारे, तीनचाकी सायकल, विहिरीचे कार्यादेश आदी लाभांचे वाटप करण्यात आले.

०००