मुंबई, दि. १ : शाश्वत शेतीच्या वाटचालीसाठी कृषी विभाग काम करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील १०० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत कार्यालयीन सुधारणा मोहिमेत सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या मंत्रालयीन विभागामध्ये पहिल्या टप्प्यात कृषी विभागाने ६६.१५ टक्के गुण प्राप्त करत तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे. भारतीय गुणवत्ता परिषदेकडून विभागाने केलेल्या कामांचे मुल्यांकन करण्यात आले. कृषी विभागात शेतकऱ्यांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना, नव्या योजनांची अंमलबजावणी, पारदर्शकता, नवकल्पना, आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर या बाबींवर भर दिला असल्याचे कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.
कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे म्हणाले की, पदभार स्वीकारल्यानंतरच्या या १०० दिवसांच्या कालावधीत शेतकरी आणि शेतीच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहोत. विभागीय परिसंवाद दौ-याच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद साधला. पुणे येथे महाराष्ट्रातील पहिली कृषी अधिकारी व कर्मचारी कार्यशाळा यशस्वी झाली. बियाणे- खत -किटकनाशक उत्पादक कंपन्या आणि विक्रेते संघटनांसोबत गुणवत्तेची खात्री, बाजारातील उपलब्धता आणि संभाव्य समस्या यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
कृषी मंत्री ॲड. कोकाटे म्हणाले की, ॲग्रीस्टेक या (शेतकरी आयडी उपक्रम) आयडीद्वारे सर्व योजनांचा लाभ एकाच ओळखीद्वारे मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांची खरी संख्या व माहिती अचूकपणे उपलब्ध होणार आहे तसचे राज्यात 92 लाख शेतकरी ID तयार झाले आहेत त्यामुळे शेतकरी डेटाचा मजबूत आधार तयार झाला आहे. एक खिडकी सेवा उपक्रमामध्ये सर्व कृषी योजना, सेवा आणि माहिती एका प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार असून शेतकऱ्यांसाठी अर्ज, ट्रॅकिंग, आणि तक्रार निवारण एकाच ठिकाणी अॅप व वेब पोर्टलच्या माध्यमातून सेवा प्रदान होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, सूक्ष्म सिंचन योजना,कृषी यांत्रिकीकरण योजना, जमीन आरोग्य पत्रिका वितरण यासह केंद्र व राज्य शासनाच्या योजना प्रभावीपणे राबविल्या आहेत. कार्यालयीन व्यवस्थापन सुधारणा, तक्रार निवारण, कार्यालयीन बाबी आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर या बाबी यावर १०० दिवसात भर दिला आहे. अधिक प्रभावीपणे काम करण्याची जबाबदारी वाढली असल्याचेही कृषीमंत्री ॲड. कोकाटे यांनी सांगितले.
*****
संध्या गरवारे/विसंअ/