रस्ता सुरक्षा भागीदारी राष्ट्रीय स्तरावर आदर्श मॉडेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्य शासनासोबत मर्सिडीज-बेंझ इंडियाची समृद्धी महामार्गावरील रस्ता सुरक्षा भागीदारी सुरक्षित प्रवासाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल

मुंबई, दि. १५: महाराष्ट्र शासनासोबत समृद्धी महामार्गावर केंद्रित असलेल्या एका महत्त्वाच्या रस्ते सुरक्षा प्रकल्पावर भागीदारी म्हणून मर्सिडीज- बेंझ इंडिया सीएसआर उपक्रमाद्वारे सहयोग करत आहे, ही निश्चितच स्वागतार्ह बाब असून हा उपक्रम हा राष्ट्रीय पातळीवर एक आदर्श मॉडेल ठरत आहे. याच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे महाराष्ट्रातील इतर उच्च-धोकादायक मार्गांवर हे मॉडेल लागू करण्याचा मार्ग खुला झाला असल्याच्या भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या.

समृद्धी महामार्गावर रस्ते सुरक्षा प्रकल्पावर भागीदारी म्हणून सेव्हलाईफ फाऊंडेशनच्या माध्यमातून मर्सिडीज-बेंझ इंडियासोबत झालेल्या सामंजस्य कराराचे (एमओयू) स्वागत करताना मुख्यंमत्री म्हणाले की, या महामार्गावर दररोज सरसरी 10 लक्ष वाहने प्रवास करतात. त्यादृष्टीने या महामार्गावर रस्ता सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणूनच, ऑटोमोटिव्ह उद्योग आणि सुरक्षिततेमध्ये आघाडीवर असलेली मर्सिडीज-बेंझ इंडिया या प्रयत्नात पुढाकार घेऊन भरीव योगदान देऊ इच्छित आहे, ही बाब आनंदाची आहे. त्याचप्रमाणे रस्ते सुरक्षेवर या भागीदारीचा सकारात्मक असा आमूलाग्र परिणाम होऊ शकतो. जो  केवळ समृद्धी महामार्गावरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारच्या प्रकल्पांसाठीचा एक आदर्श निर्माण करू शकतो, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच यासाठी महाराष्ट्र महामार्ग पोलिस आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, संबंधित विभाग त्यांच्या सक्षम नेतृत्वाखाली औपचारिक भागीदारी स्थापित करण्यासाठी तसेच इतर आवश्यक सहकार्य करेल, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्र शासनाचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प असून  महाराष्ट्राला जोडणारा आणि हजारो व्यक्तींसाठी वाणिज्य, पर्यटन आणि दैनंदिन प्रवासासाठी जीवनरेखा म्हणून काम करणारा एक्सप्रेस वे आहे. दहा जिल्ह्यांना जोडणाऱ्या या महामार्गाचे काम गतीने पूर्ण करण्यात आले असून यामुळे कमी वेळात गतीमान प्रवास करण्यासाठीची अतिशय उपुयक्त सुविधा उपलब्ध झाली आहे. समृद्धी महामार्गाचे एकूण ७०१ किमीचे सर्व काम पूर्ण झाले आहे. पहिला टप्पा नागपूर ते शिर्डी (५२० किमी) ११ डिसेंबर २०२२ रोजी तर दुसरा टप्पा शिर्डी ते भरवीर (८० किमी) २६ मे, २०२३ रोजी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. तिसरा टप्पा भरवीर ते इगतपुरी (२५ किमी) ४ मार्च, २०२४ रोजी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असून उर्वरीत इगतपुरी ते आमणे (ता. भिवंडी, जि. ठाणे) हा ७६ कि.मी. चा टप्पा लवकरच वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन आहे.

मर्सिडीज-बेंझ इंडिया, एक जबाबदार कॉर्पोरेट नागरिक म्हणून, सुरक्षिततेच्या आपल्या मूल्यांशी बांधिल राहून, सेव्हलाईफ फाउंडेशन (SLF) व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) यांच्या सहकार्याने “समृद्धी महामार्गावरील शून्य मृत्यू महामार्ग” (ZFC) हा रोड सेफ्टी उपक्रम मार्च 2024 मध्ये सुरू केला आहे. हा उपक्रम 2026 पर्यंत राबवला जाणार आहे.

हा 701 किमी लांबीच्या मुंबई-नागपूर महामार्गावर राबवला जाणारा एक प्रमुख प्रकल्प असून, या मध्ये “रोड सेफ्टीच्या चार ई” – अभियांत्रिकी (Engineering), अंमलबजावणी (Enforcement), आपत्कालीन सेवा (Emergency Care) आणि जनजागृती (Education) यांच्यावर आधारित उपाययोजना राबवली जात आहेत. यामुळे 29 टक्के अपघाती मृत्यूंमध्ये घट (2023 मध्ये 151 मृत्यू, 2024 मध्ये 107) त्याचप्रमाणे या उपक्रमामुळे  महत्वाच्या मृत्यू भागांची (HFZs) ओळख पटली असून  महामार्गाच्या फक्त 17 टक्के लांबीमध्ये 39 टक्के मृत्यू झाले (डिसेंबर 2024 पर्यंत) आहेत.  सुरक्षित प्रवासासाठी मल्टी-एजन्सी समन्वय द्वारे सलग सुरक्षा ऑडिट, उपाययोजना व आपत्कालीन सेवा सुधारणा करण्यात येत असून यामध्ये  प्रमुख घटक हा  समन्वय व भागीदारी आहे, यात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC), पोलीस, आरोग्य विभाग व इतर संस्थांशी सात सल्लामसलत बैठकांद्वारे सहकार्य घेण्यात येत आहे.

अभियांत्रिकी उपाययोजना

तसेच अभियांत्रिकी उपाययोजना राबवण्यात येत आहे. यामध्ये 626 किमीचा रस्ता अपघात संवेदनशीलता अभ्यास त्याचप्रमाणे उच्च मृत्यू झोनमध्ये सुधारणा – चिन्हे, गो स्लो मार्किंग, वेग मर्यादा दर्शक लावण्यात आले असून 12 ठिकाणी महत्त्वपूर्ण रस्ता चिन्हांची स्थापना करण्यात आली आहे. तसेच चालत असलेले वेग कॅमेरे, सहा वेग निर्देशक बोर्ड (VASS) बसवले. VIDES प्रणाली द्वारे चुकीच्या सवयी (सीटबेल्ट न लावणे, चुकीच्या लेनमध्ये वाहन चालवणे) पकडणे सुरू आहे. सत्तर  हून अधिक अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण करण्यात आले आहे.

आपत्कालीन सेवा सुधारणा

वैजापूर SDH आणि जालना जिल्हा रुग्णालय यांच्यात सुविधा सुधारणा यामध्ये  – डिफिब्रिलेटर, ईसीजी, सर्जिकल किट. 90 प्राथमिक प्रतिसादकर्त्यांचे BTLS प्रशिक्षण आणि WHO च्या “Chain of Survival” तत्त्वानुसार काम करण्यात येत आहे.

जनजागृती व शिक्षण

सुरक्षित वाहन चालवण्याच्या दृष्टीने दीर्घकालीन डिजिटल मोहीम राबवण्यात येत असून यामध्ये फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, लिंक्डइन या विविध समाजमाध्यमांवर याबाबत जनजागृती करण्यात येत आहे.  तसेच 2025–2026 मध्ये प्रकल्पाचा विस्तार करून आणखी उपाययोजना राबवली जाणार.

हा उपक्रम हा राष्ट्रीय पातळीवर एक आदर्श मॉडेल ठरत आहे. डेटा-आधारित उपाय, शासकीय नेतृत्व आणि बहु-हितधारक समन्वयातून रस्ते अपघातातील मृत्यू मोठ्या प्रमाणावर कमी करता येतात हे यातून स्पष्ट झाले आहे.

०००

वंदना थोरात/विसंअ/