मुंबई दि. 26 : आपत्तीमध्ये काम करण्याला आमचे प्राधान्य आहे. अद्ययावत राज्य आपत्कालीन कार्य केंद्राद्वारे कोणत्याही प्रकारच्या आपत्ती परिस्थितीला सामोरे जाण्यास सज्ज असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. राज्यातील सध्याच्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील अद्ययावत अशा राज्य आपत्कालीन कार्य केंद्राला भेट देऊन त्यांनी आढावा घेतला व माध्यमांशी संवाद साधला.
आपत्कालीन कार्य केंद्र तंत्रज्ञानाने सुसज्ज असे झाल्याने कोणत्याही आपत्तीत शासनाला योग्य व्यवस्थापन करणे सहज शक्य होईल असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी केंद्रातील प्रशिक्षित कर्मचाऱ्यांशी बोलून त्यांच्याकडून ते कशा पद्धतीने काम करतात आणि तंत्रज्ञान वापरता याची माहितीही घेतली आणि समाधान व्यक्त केले. यावेळी मदत व पुनर्वसन अपर मुख्य सचिव सोनिया सेठी तसेच आपत्ती व्यवस्थापन प्रभाग संचालक सतीशकुमार खडके यांनी त्यांना कालपासून राज्यभरात सुरु असलेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत तसेच करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
९.५ कोटी नागरिकांना अलर्ट
तंत्रज्ञानाने सुसज्ज अशा या आपत्ती व्यवस्थापन केंद्रातून पावसाचे तसेच संभाव्य विजा पडण्याचे अलर्ट ९.५ कोटी नागरिकांना पाठविण्यात आल्याची माहिती सोनिया सेठी यांनी यावेळी उपमुख्यमंत्र्यांना दिली. तर ठाणे, रायगड, मुंबई , पुण्यातील घाट विभागात रेड अलर्ट जाहीर करण्यात आल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
एनडीआरएफ पथके तसेच इतर बचाव यंत्रणा त्याचप्रमाणे सर्व जिल्हा प्रशासन व पालिकांशी आपत्ती व्यवस्थापन केंद्रांमार्फत सातत्याने संपर्क ठेवला जातो आणि वेळोवेळीचे अलर्ट त्यांना दिले जातात त्यामुळे कुठेही बचाव कार्य किंवा मदत पोहचवायची असेल तर लगेच ते करता येते असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.
तज्ञ कर्मचाऱ्यांशी चर्चा
यावेळी उपमुख्यमंत्री यांनी केंद्रातील तज्ञ, तसेच तांत्रिक कर्मचाऱ्यांकडून प्रत्यक्ष व्यवस्था कशी काम करते ते जाणून घेतले आणि समाधान व्यक्त केले. हे कर्मचारी २४ तास काम करतात, त्यांची राहण्याच्या व्यवस्था आणि इतर अडचणी तत्काळ दूर करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधितांना दिले.
ठाण्याच्या धर्तीवर पथके
ठाण्याच्या धर्तीवर आपत्ती प्रतिसाद दले सर्व महानगरपालिकांमध्ये तत्काळ नियुक्त करण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी प्रधान सचिव नगरविकास डॉ गोविंदराज यांना दिले. कोकण आपत्ती सौम्यीकरणाची किती कामे पूर्ण झाली आहेत त्याचा आढावाही त्यांनी घेतला.
यावेळी उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोना त्याचप्रमाणे आपत्ती कार्य केंद्राचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते
0000