नाशिक, दि. २९ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा त्रिशताब्दी जन्मोत्सव सोहळा सर्वत्र साजरा करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. अहिल्यादेवींचे कार्य प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा (विदर्भ, तापी, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी सोहळा समितीतर्फे त्यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आज सकाळी चांदवड येथील होळकर वाडा (रंग महालात) येथे ‘जागर होळकरशाहीचा’ या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, आमदार चित्रा वाघ, आमदार डॉ. राहुल आहेर, आमदार दिलीप बनकर, आमदार नितीन पवार, युवराज यशवंतराव होळकर अमरजीत बारगळ, माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ. श्वेता चौधरी, अंजली बारगळ, सुजाता बाबर, डॉ. मेघा मलोसे, श्वेता बोकील, संगीता पाटील, ज्योत्स्ना होळकर, आम्रपाली कोकरे, सुचेता खताळ, शैलजा जाधव, ॲड. अर्चना शर्मा आदींना अहिल्या सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आले. यानिमित्त रंगमहाल येथे शस्त्र प्रदर्शन भरविण्यात आले होते.
मंत्री महाजन म्हणाले की, चांदवडचा रंगमहाल ही वास्तू डोळे दीपवणारी आहे. अहिल्याबाईंनी महिलांची ताकद ओळखली होती. त्यांनी अनिष्ट प्रथा बंद केल्या. त्यांनी प्रशासक म्हणून उत्तम कामगिरी बजावली. ३०० वर्षांपूर्वी त्यांनी जल संवर्धनाचे महत्त्व ओळखले होते. अहिल्यादेवी यांना अभिवादनासाठी राज्य शासनाने काही दिवसांपूर्वी चौंडी येथे मंत्रिमंडळाची बैठक घेतली. होळकर साम्राज्याची उपराजधानी असलेल्या चांदवड येथे अहिल्याबाई होळकर यांचे शिल्प साकारण्यात येईल. तसेच त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वास्तूंच्या संवर्धनासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. आगामी कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना चांदवड येथील रंगमहालाची माहिती देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
मंत्री भुसे म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी देशात विकास कामे केली. मालेगाव येथील पूल त्यांनी बांधला आहे. शालेय विद्यार्थ्यांना रंगमहालाची सहल घडविण्यात येईल. आगामी कुंभमेळाच्या आराखड्यात रंगमहालाचा समावेश करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
पणन मंत्री रावल म्हणाले की, अहिल्याबाई होळकर यांचा राज्यकारभार प्रेरणादायी आहे. त्यांचा पावन पदस्पर्श या वास्तूला लाभला आहे. या वास्तूच्या संवर्धनाची जबाबदारी आपल्यावर आहे.
आमदार वाघ म्हणाल्या की, अहिल्यादेवींनी महिला सक्षमीकरणाची सुरूवात केली. निसर्गाचीही त्यांनी सेवा केली.
युवराज होळकर यांनी सांगितले की, अहिल्यादेवींचे व्यक्तिमत्व अलौकिक होते. त्यांनी सामाजिक न्याय, महिला सक्षमीकरण याला प्राधान्य दिले. रंगमहाल या ऐतिहासिक वास्तूचा जीर्णोद्धार करून जागतिक वारसा स्थळ घोषित होण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सोनाली तेलंग यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची माहिती दिली. आमदार डॉ. आहेर यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या बारव पुनरुजीवन करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. माजी नगराध्यक्ष कासलीवाल यांनी आभार मानले. यावेळी होळकर राज परिवाराशी निगडित व्यक्ती, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
०००