पालकमंत्र्यांकडून दिग्रस तालुक्यातील प्रलंबित तक्रारींचा आढावा

तक्रारदार, निवेदनकर्त्यांसोबत साधला संवाद

यवतमाळ, दि.२९ (जिमाका) : दिग्रस तालुक्यातील प्रलंबित तक्रारींचा पालकमंत्री संजय राठोड यांनी आज आढावा घेतला. तक्रारदार, निवेदनकर्त्यांसोबत संवाद साधत त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. तेथेच संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कारवाई करण्याच्या सूचना केल्या.

यावेळी उपवनसंरक्षक डॉ.बी.एन.स्वामी, उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल, बांधकामचे कार्यकारी अभियंता महेश माथुलकर, तहसीलदार मयुर राऊत, गटविकास अधिकारी श्री.खरोडे, नगर परिषद मुख्याधिकारी अतुल पंत, उपविभागीय कृषी अधिकारी एस.एच.गोसावी, तालुका कृषी अधिकारी एस.एस.राजपूत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आशिष पवार, अरुणावती प्रकल्पाचे सहाय्यक अभियंता अखिल चव्हाण, जलसंधारण अधिकारी प्र.ह.सैनी यांच्यासह उपविभाग व तालुकास्तरीय सर्व अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री कार्यालयाकडे ऑनलाईन दाखल झालेल्या परंतू विभागांद्वारे त्यावर वेळेवर योग्य कार्यवाही न झालेल्या तक्रारी, निवेदनांवर पालकमंत्र्यांनी तक्रारदारांसमक्ष विभागांसोबत चर्चा करून कालमर्यादेत योग्य कारवाई करण्याचे निर्देश दिले. यावेळी पालकमंत्र्यांनी जवळजवळ ५० पेक्षा अधिक तक्रारदार, निवेदनकर्त्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला. त्यांच्या तक्रारी, समस्या जाणून घेतल्या.

भजनी मंडळांना साहित्य, घरकुल निधी हप्ता, सुरळीत पाणी पुरवठा, नाला खोलीकरण व रुंदीकरण, अतिक्रमण जमीनीवर घराचे बांधकाम, नवीन विहीर, बॅकेद्वारे परस्पर रक्कमेची कपात, स्मशानभूमीसाठी जागा, रस्ता, योग भवन बांधकाम, ग्रामसभा नियमित घेतली जात नाही, पांदन रस्त्यांची दुरुस्ती, अनुकंपा तत्वावर नियुक्ती, स्वयंरोजगारासाठी बिज भांडवल, सातबारावर क्षेत्र दुरुस्ती, अतिक्रमण जागेवरील बांधकाम थांबविणे, वीज कनेक्शन, लिंगा वाई येथे विकास कामे, सभामंडपाचे बांधकाम, टिनशेड बांधकाम आदी विषयांवरील प्राप्त तक्रारी, निवेदनावर कारवाईच्या पालकमंत्र्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

०००