मुंबई, दि. ३०: राज्यात मागील २४ तासांमध्ये (३० मे रोजी सकाळपर्यंत) धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक ४२.२ मिमी पाऊस झाला आहे, तर बीड २४ मिमी, जालना १३.९ मिमी, सोलापूर १२.१ मिमी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ११.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
राज्यात कालपासून आज ३० मे रोजी सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी पुढीलप्रमाणे (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये) :
रायगड ०.३, रत्नागिरी ३.९, सिंधुदुर्ग ११.२, पालघर ०.१, नाशिक ०.६, धुळे ०.४, जळगाव ०.१, अहिल्यानगर ०.५, सोलापूर १२.१, सातारा १, सांगली ०.९, कोल्हापूर ०.८, छत्रपती संभाजीनगर ०.६, जालना १३.९, बीड २४, लातूर ५.१, धाराशिव ४२.२, नांदेड ९.३, परभणी ३, हिंगोली ०.२, बुलढाणा २.२, अकोला ०.१, वाशिम ०.२, अमरावती ३.४, यवतमाळ ६.५, वर्धा ८.७, नागपूर १.४, भंडारा ०.७, गोंदिया ३.९, चंद्रपूर १.२ आणि गडचिरोली २.५.
धाराशिव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे वाहतुकीचे मार्ग बदलण्यात आले. मात्र, पावसामुळे कोणतीही जीवित हानी झालेली नाही.
आंबोली घाट मार्गावर वाहतूक सुरळीत सुरू
सिधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली घाटात रस्त्यावर दरड कोसळली राष्ट्रीय महामार्ग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पथकाने रस्त्यावरील कोसळलेली दरड हटवली असून या मार्गावर वाहतूक सुरळीतपणे चालू आहे.
इंडो अमाईन्स कंपनीतील वायू गळती बंद
महाड येथील इंडो अमाईन्स या कंपनीमध्ये वायू गळतीमुळे एक कामगार जखमी झाला आहे. सध्या वायू गळती बंद असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून सांगण्यात आले.
दिनांक २९ मे २०२५ रोजी ठाणे जिल्ह्यात रस्ता अपघातात एक व्यक्ती, नांदेड जिल्ह्यात पाण्यात बुडून दोन व्यक्ती मृत पावल्या आहेत, तर सोलापूर जिल्ह्यात भिंत पडून चार व्यक्ती जखमी झाल्या आहेत.
राज्यात सर्व जिल्ह्यात पावसाची नोंद झाली आहे. सद्यस्थितीत परिस्थिती नियंत्रणात असून कुठेही पूरपरिस्थिती उद्भवलेली नाही. राज्य आपत्कालीन कार्य केंद्र सर्व जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्रांच्या सातत्याने संपर्कात आहे. पूरपरिस्थितीबाबत उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ व एसडीआरएफ पथकांना आपत्कालीन परिस्थितीकरिता सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून सांगण्यात आले आहे.
राज्यात २९ ते ३० मे २०२५ दुपारी ४ वाजेपर्यंत भिंत कोसळणे, झाड पडणे, वीज कोसळणे, पाण्यात बुडणे, आगीत जळणे, पुराचे पाण्यामुळे, रस्ते अपघात या घटनेत तीन व्यक्ती व तीन प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील एक आणि नांदेड जिल्ह्यातील दोन व्यक्तींचा समावेश आहे. तसेच सात व्यक्ती जखमी झाली असल्याची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली.
०००
एकनाथ पोवार/विसंअ/