मुंबई, दि. ३०: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य, विचार आणि प्रेरणादायी जीवनगाथा जनसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहचविणे आवश्यक असल्याने त्यांच्या ३०० व्या जयंती दिनाचे औचित्य साधून ३१ मे २०२५ रोजी पशुसंवर्धन विभागामार्फत राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.
अहिल्यादेवी या भारतीय इतिहासातील एक तेजस्वी, कर्तबगार व दूरदृष्टी असणाऱ्या स्त्रीशक्तीचे प्रतीक आहेत. त्यांनी धार्मिक सहिष्णूता, समाजकल्याण, सार्वजनिक बांधकाम, न्यायप्रविष्ट प्रशासन आणि स्त्री शिक्षणाच्या माध्यमातून आदर्श राज्यकारभाराची उभारणी केली. त्यांचे कार्य समाजसेवा, धर्मनिष्ठा आणि कुशल प्रशासनाचे प्रतीक असून, ते महाराष्ट्र राज्याच्या प्रगत व उन्नत वाटचालीसाठी नेहमीच पथदर्शी ठरले आहे. यास अनुसरुन ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ यांच्या 300 व्या जयंती वर्षानिमित्त पशुसंवर्धन विभागामार्फत अधिनस्त संस्थांमध्ये कार्यालय/ दवाखाना परिसर स्वच्छता व सुशोभिकरण करणे, गाव पातळीवर वंधत्व/सर्वोपचार शिबिरांचे आयोजन करणे, फिरस्ती मेंढपाळांची भेट घेऊन त्यांना तांत्रिक मार्गदर्शन करणे, मेंढपाळांच्या शेळ्या-मेंढ्यांचे मान्सूनपूर्व लसीकरण करणे, पशुधनाचे जंतनिर्मूलन, गोचीड निर्मूलन, करडे/कोकरे मरतूक कमी करण्याबाबत उपाययोजना करणे, मेंढपाळांसाठी तांत्रिक मार्गदर्शन करण्यासाठी शिबिर/परिसंवादाचे आयोजन करणे, वृक्ष लागवड करणे इत्यादी उपक्रम राबविण्यात यावेत, अशा सूचना मंत्री मुंडे यांनी दिल्या आहेत.
पशुसंवर्धन आयुक्त रामस्वामी एन. आणि पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्रवीणकुमार देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली जयंती वर्षानिमित्त विभागाच्या मुख्यालयातही अभिवादनपर कार्यक्रम होणार आहे.
“पशुसंवर्धन विभागाच्या या उपक्रमांमुळे मेंढी-शेळी पालकांशी थेट संवाद साधत शासनाचे विविध उपक्रम, योजना तसेच शेळी-मेंढी तांत्रिक व्यवस्थापनाविषयी माहिती पशुपालकांना देणे शक्य होईल. तसेच शेळी-मेंढीपालनाला आधुनिक व्यवसाय व्यवस्थापनाच्या माध्यमातून अधिक किफायतशीर करण्यासाठी विभागाला आवश्यक धोरणांची निर्मिती व अंमलबजावणी करणे सुलभ होईल”, असा विश्वास मंत्री मुंडे यांनी व्यक्त केला आहे.
०००
नंदकुमार वाघमारे/विसंअ/