मुंबई, दि. ५ : एकल वापरातील प्लास्टिक हा असूर असून त्याला पूर्णतः नष्ट करण्यासाठी पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या माध्यमातून कार्य करत आहोत. या कामात जनतेचा सहभाग आवश्यक आहे. यासाठी नागरिकांनी पर्यावरण संवर्धनाची सुरुवात स्वतःपासून करावी, असे आवाहन पर्यावरणीय व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या विद्यमाने पर्यावरण परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक कार्य, माहिती तंत्रज्ञान मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या सचिव जयश्री भोज, मंडळाचे सदस्य सचिव डॉ. अविनाश ढाकणे आदी उपस्थित होते.
पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, गेल्या काही काळापासून होत असलेले वातावरणातील बदल हे गंभीर व अंतर्मुख करणारे आहे. त्यामुळे एकल वापर प्लास्टिक वापरावर बंदीसाठी अभियान सुरू केले आहे. अशा अभियानात लोकसहभाग असेल तर हे उपक्रम यशस्वी होतात. एकल वापर प्लास्टिक मुक्त परिसराच्या अभियानाची सुरुवात मंत्रालयापासून केली. बदलती जीवनशैली व वातावरणातील बदलांमुळे कर्करोगासारखे आजार आज मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येते. त्याचबरोबर तंत्रज्ञान वाढले तसे त्याचे दुष्परिणामही दिसून येत आहेत. या सर्वांपासून पर्यावरण वाचविण्याची सुरूवात प्रत्येकाने स्वतःपासून करावी. आजच्या पिढीने प्लास्टिक बाटल्या न वापरणे, एकल वापराच्या प्लास्टिक ऐवजी कापडी पिशव्या वापरणे अशी पाऊले उचलली तर पुढच्या पिढीसाठी चांगले जीवन मिळेल.
पुढील पाच वर्षात एकल वापराचे प्लास्टिक पूर्णतः बंद करण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर अशी उत्पादने तयार करणाऱ्यांविरुद्ध पोलीस कारवाईसाठी प्रयत्न करणार आहे. मात्र, नागरिकांनीच स्वयंस्फूर्तीने एकल प्लास्टिक वापरणे बंद केले तरच अशी उत्पादने तयार करणे आपोआप बंद होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मी स्वतः आलेल्या अभ्यागतांना बुके, साडी किंवा शाल ऐवजी अकरा कापडी पिशव्या द्यावेत, असे आवाहन करते. त्यातून जमा होणाऱ्या पिशव्या वापरण्यासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे, असेही मंत्री श्रीमती मुंडे यांनी यावेळी सांगितले.
प्लास्टिक मुक्त अभियानाच्या जनजागृतीसाठी सांस्कृतिक कार्य विभाग सहकार्य करणार – मंत्री ॲड.आशिष शेलार
सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार म्हणाले की, पर्यावरण विभागाने महापर्यावरण हे ॲप्लिकेशन सुरू करून महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. विकसित, संपन्न, समृद्ध व दिशादर्शक कामे करणारे महाराष्ट्र हे देशातील महत्त्वाचे राज्य आहे. त्यामुळे राज्य वातावरणीय बदल कृती आराखडा हा देशासाठी दिशादर्शक ठरणार आहे.
पर्यावरण हा विषय उपदेश नसून आत्मचिंतनाचा, आत्मबोधाचा, गुणवत्ता प्रसाराचा विषय आहे. पर्यावरण रक्षणाची भूमिका संत ज्ञानेश्वरांनी पहिल्यांदा मांडली. ज्ञानेश्वरांनी पर्यावरण पोषणाचा विचार मांडला. हा विचार गावागावत पोहोचविण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग पर्यावरण विभागाबरोबर काम करेल, असेही सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी यावेळी सांगितले.
पर्यावरण संवर्धनासाठी विविध उपाययोजना – जयश्री भोज
पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या सचिव जयश्री भोज म्हणाल्या की, राज्यात वातावरणीय बदलामुळे होणारे विविध परिणाम लक्षात घेता, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग पर्यावरण विषयक विविध अधिनियमांच्या अंमलबजावणी बरोबरच विविध उपाययोजना राबवत आहे. वातावरणीय कृती आराखड्याची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी, राज्य वातावरणीय कृती कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात बांबू लागवडीस शेतकऱ्यांना उद्युक्त करण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली पर्यावरण व शाश्वत विकास टास्क फोर्स गठित करण्यात आला आहे. याशिवाय माझी वसुंधरा अभियान, राज्याचे परिसंस्था आधारित अनुकूलन धोरण, मानवनिर्मित देवराई व घनवने निर्माण करणे, कार्बन बाजारपेठ सुविधा कक्ष, सर्क्युलर इकॉनॉमी धोरण, विद्युत वाहन धोरण आदीच्या माध्यमातून कामे करण्यात येत आहेत.
मिठी नदी पुनरुज्जीवनासाठी काम करणार – सिद्धेश कदम
महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम म्हणाले की, एकल वापर प्लास्टिक कमी करण्यासाठी जनतेची साथ आवश्यक आहे. त्याचबरोबर सध्या समुद्राचे पाणी काळे होत आहे. हा रंग बदलण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. मुंबईतील मिठी नदीच्या पुनरुज्जीवनासाठीही आम्ही काम करत आहोत.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. ढाकणे यांनी प्रास्ताविकात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. पर्यावरण संवर्धनासाठी शासनाकडून प्रयत्न होत आहेत. मात्र, नागरिकांनीही सहभाग घेणे आवश्यक आहे. विभागाच्या वतीने राज्यात २२ मार्चपासून विविध उपक्रम सुरू असून आतापर्यंत सुमारे एक हजाराहून अधिक जनजागृतीपर कार्यक्रम झाले आहेत. पर्यावरण परिषदेतील तज्ज्ञांच्या सूचनांचा विचार केला जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
वातावरणीय बदल कृती आराखडा व महापर्यावरण ॲपचे अनावरण
यावेळी मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य वातावरणीय बदल कृती आराखडा, माझी वसुंधरा अभियान ६.० टूल किट चे तसेच सल्फरडाय ऑक्साईड इमिशन ट्रेडिंग स्किमच्या संकल्पनेचे अनावरण करण्यात आले. प्रदूषणासंदर्भातील तक्रारीसाठी तयार करण्यात आलेल्या ‘महा पर्यावरण’ ॲप्लिकेशनचे अनावरणही मंत्री श्रीमती मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आयोजित विविध परिसंवादामध्ये विविध विषयांवर तज्ज्ञांनी सहभाग घेऊन चर्चा केली.
0000
नंदकुमार वाघमारे/विसंअ/