अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत एकूण १२ लाख ७१ हजार २९५ विद्यार्थ्यांची नोंदणी

मुंबई, दि. 5 : राज्यामध्ये सन 2025-26 पासून उच्च माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रणालीद्वारे राबविण्यात येत आहेत. या प्रक्रियेत आज अंतिम मुदतीपर्यंत एकूण 12 लाख 71 हजार 295 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली असल्याची माहिती प्र.संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) डॉ.श्रीराम पानझाडे यांनी दिली आहे.

या प्रक्रियेसाठी राज्यातील कनिष्ठ महाविद्यालय/ उच्च माध्यमिक शाळांची पहिल्या फेरीमध्ये 9,435 नोंदणी करण्यात आलेली आहे. त्यामध्ये एकूण विद्यार्थी प्रवेश क्षमता 21,23,040 इतकी असून त्यापैकी कॅप फेरीसाठी प्रवेश क्षमता 18,97,526 तर कोटा प्रवेश क्षमता 2,25,514 इतकी आहे. यासाठी दिनांक 26 मे ते 5 जून 2025 या कालावधीत https://mahafyjcadmissions.in या संकेतस्थळावर विद्यार्थी नोंदणी करण्यात आली.

यामध्ये 1215190 विद्यार्थ्यांनी नोंदणी (रजिस्ट्रेशन) शुल्क ऑनलाईन जमा केलेले आहे. 12,05,162 विद्यार्थ्यानी अर्ज भाग-1 भरलेले आहेत. तर, अर्ज भाग-2 भरुन अंतिम करुन 11,29,924 विद्यार्थ्यांनी लॉक केलेले आहेत. नियमित फेरी (कॅप राऊंड) साठी 11,29,932 विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत. इनहाऊस कोटा साठी 64,238 विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत. व्यवस्थापन (मॅनेटमेंट) कोटासाठी 32,721 विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत. अल्पसंख्याक (मायनॉरिटी) कोटासाठी 47,578 विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत.

वेळापत्रकानुसार शून्य फेरी गुणवत्ता यादी 8 जून 2025 रोजी जाहीर होणार असून दिनांक 9 जून ते 11 जून 2025 या कालावधीत कनिष्ठ महाविद्यालयात प्रत्यक्ष प्रवेश होणार आहेत. तसेच कॅप फेरीची गुणवत्ता यादी 10 जून 2025 रोजी जाहीर होणार असून दिनांक 11 जून ते 18 जून 2025 या कालावधीत कनिष्ठ महाविद्यालयात प्रत्यक्ष प्रवेश होणार आहेत.

अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळ- https://mahafyjcadmissions.in पाहावे. तसेच ई-मेल आयडी support@mahafyjcadmissions.in अथवा हेल्पलाईन नंबर 8530955564 वर संपर्क साधावा, असे आवाहन शिक्षण संचालनालयामार्फत करण्यात आले आहे.

००००

बी.सी.झंवर/विसंअ/