ठाणे,दि.09(जिमाका):- दिवा-मुंब्रा रेल्वे स्थानकांदरम्यान झालेल्या रेल्वे प्रवासी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर, राज्याचे जलसंपदा (तापी, विदर्भ आणि कोकण) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, डॉ.नरेश म्हस्के, आमदार रवींद्र चव्हाण, निरंजन डावखरे आणि राजेश मोरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल असलेल्या जखमींची भेट घेवून विचारपूस केली. यावेळी त्यांनी ठाणे व कळवा येथील रुग्णालयांना जखमींवर तातडीने उपचार करण्याचे निर्देश दिले. तसेच, या कठीण प्रसंगात शासन पूर्णपणे जखमी व त्यांच्या नातेवाईकांच्या पाठीशी उभे असल्याची ग्वाही दिली.
या हृदयद्रावक दुर्घटनेतील मृतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी मृतकांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचेही सांगितले.
या दुर्घटनेनंतर ठाणे जिल्हा प्रशासन संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याची माहिती जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली आहे. प्रशासनाकडून बचावकार्य आणि जखमींना मदत पोहोचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. ही घटना कशी घडली, याबाबत चौकशी सुरू असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना केल्या जातील, असेही शासनाने स्पष्ट केले आहे.
00000